धुळे जिल्हा हा तीन राज्यांच्या सीमेवर असल्याने, येथे ट्रान्सपोर्ट हा जवळपास मुख्य व्यवसाय आहे. जिल्ह्यात मालवाहतूक करणारी लहान-मोठी अशी पाच ते साडेपाच हजार वाहने आहेत. याच व्यवसायावर अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध, रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. याचा फटकाही या व्यवसायाला बसू लागला आहे. या निर्बंधांमुळे वाहतूक व्यवसाय ५० टक्क्यांवर आला आहे. दुकाने, हॅाटेल्स बंद असल्याने, वाहतूकदारांना माल मिळत नाही. माल मिळाल्यास तिकडून परतीचा माल मिळण्यासाठी एक-दोन दिवसांची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे चालक-सहचालकाला तेथेच थांबून रहावे लागत असते. गाडी खाली करताना संध्याकाळ होत असते. त्यातच रात्रीची संचारबंदी असल्याने, गावाहून निघण्यासाठी चालकांना दुसऱ्या दिवसाचीच वाट बघावी लागते. एकंदरीत या निर्बंधामुळे वाहतूक व्यवसायाला रोजचा किमान ३० ते ४० लाखांचा फटका बसू लागला आहे.
यामुळे चालकांचे पगार करणे, घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडणे जिकिरीचे झाले आहे
जोपर्यंत हा व्यवसाय पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत करामध्ये सवलत द्यावी, मोटार व्हेईकल टॅक्समध्ये सवलत द्यावी, तसेच कर्जाचे हप्ते बँकेने नंतर वसूल करावेत, असे आदेश शासनाने द्यावेत, अशी मागणी मनोज राघवन यांनी केली आहे.