रब्बी हंगामातील कांदा खांडणी हंगाम येथे सुरू आहे. आधीच येथे कोरोनाने कहर केल्यामुळे मजूर टंचाई निर्माण झाली आहे आणि अशातच अवकाळी पावसाला सुरुवात झाल्यामुळे काय करावे हेच येथील शेतकऱ्यांना समजत नाही.
दर महिन्याला येथे पावसाची हजेरी लागत आहे. पावसाळ्यात गरजला नाही एवढा ढगांचा गडगडाट सध्या होत असल्यामुळे येथील शेतकरी मुठीत जीव घेऊन बसले आहेत. उघड्यावरील कोणकोणते शेती उत्पादन झाकावे हेसुद्धा कळत नाही व हवेचा जोर एवढा असतो की झाकलेलेसुध्दा धड राहत नसल्यामुळे नुकसान हे ठरलेलेच असते. आधीच सर्वच प्रकारचे भागभांडवल लावून हे पीक तयार केलेले असते आणि घरादारात येण्याच्या वेळातच भिजून जात असेल तर दोष द्यावा तरी कोणाला? त्यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे दिसून आले. अशात कलिंगड पिकांवर गारांचा वर्षाव झाला तर या विचारानेच शेतकऱ्यांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.