धुळे : मातंग समाजाची अंत्ययात्रा अडविल्याची संतापजनक घटना सोलापूर जिल्ह्यातील माळेवाडी गावात घडली असून, या घटनेचे धुळे जिल्ह्यातही पडसाद उमटत आहेत. भाजपच्या अनुसूचित जाती आघाडीतर्फे नुकतीच निदर्शने करण्यात आली. अंत्ययात्रा अडविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, माळेवाडी, जि. सोलापूर येथे मातंग समाजाचे पनाजी अनंता साठे यांची अंत्ययात्रा पाेलिसांत दिलेल्या तक्रारीचा राग मनात ठेवून अडविण्यात आली. पाेलिसांत दिलेली तक्रार मागे घेत असल्याचे लेखी द्या, अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणी मृताचे नातेवाईक साठे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. अंत्ययात्रा अडवण्याच्या ठिकाणी पाेलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, पाेलीस कर्मचारी व महसूल कर्मचारी उपस्थित हाेते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी हा प्रश्न सोडविण्याची गरज होती. पण त्यांनी अधिकाराचा गैरवापर केला. या प्रकरणी दाेषींवर कारवाई करावी, पीडितांना संरक्षण द्यावे, त्यांचे पुनर्वसन करावे, पीडित कुटुंबाला ५० लाखांची मदत करावी, अधिकारांचा गैरवापर करणारे पाेलीस अधिकारी, कर्मचारी, तहसीलदार, महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात भाजपच्या अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पानपाटील, प्रदेश सरचिटणीस महेंद्र खैरनार, नगरसेवक नागसेन बाेरसे, विनायक अहिरे, प्रकाश पाेळ, माेहित चित्ते, मनुकुमार गाेयर, वानखेडकर, गणेश आगलावे, विक्की थाेरात, बंटी मंगळे आदी सहभागी झाले होते. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.