शहरातील नंदनवन बँक कॅालनी परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. नागरिकांनी रात्रीच क्रीडा संकुल येथे असलेल्या पंचवटी ग्राहक तक्रार निवारण केंद्रावर तक्रार नोंदविण्यासाठी वारंवार फोन केला; मात्र या क्रमांकावरून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. या कॅालनी परिसरात कोराेना पॅाझिटिव्ह असलेल्या काही रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत; मात्र वीज पुरवठा नसल्याने, अनेकांना श्वास घेण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. लहान मुले रात्रभर झोपू शकली नाहीत.
दरम्यान काहींनी महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर पहाटे तीन वाजता तक्रार नोंदवली; मात्र त्याची दखल सकाळी ५ वाजेपर्यंत घेण्यात आली नाही. अखेर या भागातील काही नागरिक सकाळी ५ वाजता २४ तास अत्यावश्यक सेवा देणाऱ्या तक्रार निवारण केंद्रावर गेले असता, ते बंदच होते. सकाळी सात वाजता या कार्यालयाचे प्रमुख असलेल्या भामरे यांच्या भ्रमणध्वनीवर तक्रार करूनही त्याची दखल घेतली नाही. काही जण पुन्हा या कार्यालयात गेले. बंद अवस्थेत असलेल्या शटरला कुलूप नसल्याने, काहींनी शटर उघडून पाहिले असता, तेथे कोणीही आढळून आले नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर पंचवटी ग्राहक तक्रार निवारण केंद्राच्या शेजारीच तुळशीराम नगर ग्राहक तक्रार निवारण केंद्र आहे. ते सुद्धा बंद होते.
अखेर तब्बल आठ तासानंतर या भागात वीज पुरवठा सुरू झाला. तक्रार निवारण केंद्राद्वारे वेळीच तक्रार घेतली असती तर नागरिकांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आली नसती, असे नागरिकांचे म्हणणे आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.