शहरातील मिल परिसरात सलग सहावा आठवडा झाला असून, चार ते पाच दिवसांच्या उशिराने पाणीपुरवठा होत आहे. सुरुवातीला चार दिवसाआड पाणीवितरण या भागात होत होते. पण, तांत्रिक अडचण पुढे करून पाणी वितरण केले जात नसल्याने नागरिकांचा संयम सुटल्याचे शुक्रवारी अधोरेखित होत आहे. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर कुठे नवव्या दिवसांनी पाणी आले. त्यानंतर तब्बल ११ दिवस उलटूनही पाणीच आलेले नाही. या भागातील नागरिकांना कोरोनापेक्षा आता पाण्याची सर्वाधिक चिंता भेडसावत आहे.
गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पाण्याचा विषय चांगलाच गाजला होता. पाणी येत नसल्याने नागरिकांची नाराजी ओढवून घेतली जात असल्यामुळे नागसेन बोरसे यांनी अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा सज्जड दमच भरला. याच विषयाच्या अनुषंगाने अमोल मासुळे, शीतल नवले आणि अन्य नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते. त्यानंतर तातडीने नियोजन करून विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुस्थितीत आणण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. पण, त्याच आश्वासनाचा शुक्रवारी मिल परिसरात पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले. अखेर नगरसेवक अमोल मासुळे यांनी पुढाकार घेऊन मिल परिसरात पिण्याच्या पाण्याचे टँकर मागविले. पाण्याचा टँकर येताच अनेकांनी एकच झुंबड केली. लहान मुलांसह सर्वचजण भर उन्हात टँकरजवळ पाणी घेण्यासाठी गर्दी करू लागले होेते.
कोरोना पसरू नये म्हणून लाॅकडाऊन करून लोकांनी गर्दी टाळावी, घरात बसावे, लहान मुलांसह वयोवृद्धांनी तर घराबाहेर पडू नये असे आवाहन करीत संचारबंदी लावत आहे, तर दुसरीकडे महापालिकेच्या कृपेने मिल परिसरात नळाला ११ दिवस होऊनही पाणी आले नसल्याने सर्वच जण हातात भांडी घेऊन टँकरवरून पाणी आणण्यासाठी धावत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. या भागात पाणीपुरवठ्याचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे समोर आले आहे.
कोटसाठी
शहरातील प्रभाग १७ सह मिल परिसरात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी महापालिकेत सातत्याने भांडतो आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतदेखील आवाज उठविला होता. पाणीच येत नसल्यामुळे टँकर मागविण्यात आला. कोणत्याही प्रकारचे नियोजन प्रशासनाचे नाही यातून अधोरेखित होत आहे.
अमोल मासुळे, नगरसेवक, महापालिका.