पुणे येथे घर घेण्यासाठी मोहरुन २० लाख रुपये आणले नाहीत, तसेच लग्नात योग्य मानपान दिला नाही, मानेवर मोस आहे, कामधंदा येत नाही. या कारणांवरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. होळ, ता. शिंदखेडा येथील माहेर असलेल्या चेतना (वय २७) या मुलीचे दोंडाईचा येथील गाैरव भावसार याच्याशी २२ एप्रिल २०१९ रोजी लग्न झाले. लग्नाच्या चार महिन्यांनंतर वरील कारणांवरून तिला वेळोवेळी हाताबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ करण्यात आली, तसेच माहेरुन पैसे आणले नाहीत तर तुला नांदवणार नाही, घरातून निघून जा, असा दम देत अंगावरील स्त्रीधन बळजबरीने काढून घेतले आणि घरातून हाकलून दिले.
याप्रकरणी चेतनाने दिलेल्या फिर्यादीवरून गाैरव भावसार, अर्चना भावसार, पूजा विशाल भावसार आणि सासरा यांच्याविरुद्ध नरडाणा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४९८ अ, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक बी. एस. बोरसे करीत आहेत.
पाटण, ता. शिंदखेडा येथील माहेर असलेल्या गायत्री अर्जुन कोळी (वय ३५) या विवाहितेचा दादरा नगरहवेली येथे सासरी तसेच माहेरी शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. प्लाॅट घेण्यासाठी माहेरुन २ लाख रुपये आणावेत, असा तगादा लग्नाच्या एक महिन्यानंतर लावला होता. या कारणावरून सतत छळ करण्यात आला. याप्रकरणी गायत्रीने दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी शिंदखेडा पोलीस ठाण्यात अर्जुन मोतीलाल कोळी, मीराबाई मोतीलाल कोळी, मोतीलाल चैत्राम कोळी, प्रभाकर मोतीलाल कोळी रा. दादरा नगरहवेली यांच्याविरुध्द भादंवि कलम ४९८ अ, ४०६, ३२३, ५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक निंबाळे करीत आहेत.
वेल्हाणे, ता. धुळे येथील माहेर असलेल्या दीपाली श्रीकांत घोलप (वय २०) या विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. चप्पल-बुटचे दुकान सुरू करण्यासाठी माहेरुन १ लाख रुपये आणावेत, यासाठी सप्टेबर २०१९ पासून वेळोवेळी शिवीगाळ, हाताबुक्क्यांनी मारहाण करून तिचा छळ करण्यात आला. तिच्या वडिलांना देखील शिवीगाळ करून तिला आणि तिच्या वडिलांना घरातून हाकलून दिले.
याप्रकरणी दीपालीने दिलेल्या फिर्यादीवरून तिचा पती श्रीकांत शिवदास घोलप, शिवदास परबत घोलप, प्रवीण शिवदास घोलप, राजेश शिवदास घोलप, अन्य एक दीर अशा पाच जणांविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४९८ अ, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सासूने केला जावयाविरुद्ध गुन्हा दाखल
धुळे : मुलीला पाण्याच्या नळीने मारहाण केली म्हणून सासूने जावयाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची घटना साक्री तालुक्यातील निजामपूर गावात मंगळवारी दुपारी घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निजामपूर येथे कमलाबाई मोहन जाधव (वय ६४, रा. शिंदखेडा) यांचे आणि त्यांचे व्याही पंढरीनाथ महिरे यांच्यात घरगुती वादावरून बोलणे चालू असताना राग येऊन कमलाबाई यांच्या मुलीला पाण्याच्या नळीने मारहाण करण्यात आली. मुलीला घेऊन घराबाहेर निघाली त्यावेळी तिलादेखील पाण्याच्या नळीने मारहाण करण्यात आली, तसेच शिवीगाळदेखील केली. याप्रकरणी कमलाबाईने दिलेल्या फिर्यादीवरून पंढरीनाथ गबा महिरे, योगेश पंढरीनाथ महिरे, संगीता पंढरीनाथ महिरे रा. आखाडे, ह. मु. निजामपूर यांच्याविरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक चाैधरी करीत आहेत.