गेल्या वर्षी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे २४ मार्चपासून सर्वच वाहतूक बंद करण्यात आलेली होती. त्यात बसेसचाही समावेश होता.
मात्र, यावेळी राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता देण्यात आलेली आहे. सर्वसामान्य प्रवाशांना तूर्त काही दिवस बसप्रवास करण्यास मनाई असली, तरी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, तसेच वैद्यकीय कामासाठी जाणाऱ्यांसाठी, तसेच दिव्यांगांना प्रवासासाठी मुभा देण्यात आलेली आहे. बसमध्ये फक्त २२ प्रवासी बसविण्यासच परवानगी देण्यात आलेली आहे.
जळगावसाठी सोडली बस
दरम्यान, नवीन नियम लागू झाल्यानंतर धुळे आगारातून शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत फक्त जळगावसाठी एकमेव बस सोडण्यात आली होती, तर नाशिक आगारातून आलेल्या बसमध्ये नऊ प्रवासी गेल्याचे सांगण्यात आले.
ओळखपत्राशिवाय प्रवेश नाही
दरम्यान, बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जात नाही, तसेच कोणत्या कारणासाठी प्रवास करीत आहे, याचीही विचारणा केली जात आहे.
प्रवाशांच्या हातावर मारणार शिक्का
दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्या प्रवाशाच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात येणार आहे.
मनपाचे पथक येणार
बाहेरगावाहून शहरात येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर क्वारंटाइनचे शिक्के मारण्यासाठी महापालिकेचे पथक बस स्थानकात येणार असल्याचे सांगण्यात आले. बसला आंतरजिल्हाची अट नाही.