प्रभाग क्रमांक सहामधील गोपाळनगर, दत्त कॉलनी, पांजरा कान कॉलनी, सुशीलानगर, महावीरनगर येथे पूर्ण क्षमतेने वेळेवर पाणीपुरवठा होत नाही, सध्या उन्हाळा सुरू झाल्याने नागरिकांना पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. अनेक दिवस नळांना पाणी येत नाही. आले तर अतिशय कमी क्षमतेने येते. याचे व्यवस्थित नियोजन करावे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॉलनीमध्ये अनेक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे स्वच्छता व फवारणी करणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक खांबांवरचे दिवे बंद अवस्थेमध्ये आहेत. तेथे त्वरित नवीन लाइट बसवण्यात यावेत या मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी देवेंद्र सिंग परदेशी यांना देण्यात आले. या वेळेस त्यांनी पाणीपुरवठा करणारे कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांना बोलावून त्वरित या समस्या निकालात काढाव्यात अन्यथा कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. यामुळे प्रभागातील नागरिकांचे समाधान झाले आहे. कॉलनीमध्ये फक्त घंटागाडी येते. या गाडीत फक्त घरातीलच घाण व कचरा घेतला जातो. परंतु रस्त्याच्या कडेला व सार्वजनिक ठिकाणी पडलेला कचरा उचलला जात नाही. तेथे अनेक दिवस तो कचरा पडून राहिल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. हा कचरा उचलण्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु यापुढे ट्रॅक्टरवरचे स्वच्छता कर्मचारी कॉलनीमध्ये येतील, असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले आहे. याप्रसंगी दिनेश नेरकर, आबा सोनवणे, सतीश पगार, भय्या देवरे, अंकित पाटील, महेंद्र देसले, स्वप्निल भावसार आदी उपस्थित होते.
पालिकेने नागरी सुविधा पुरवाव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:36 IST