खलाणे ते दराणे रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाल्याने या रस्त्यावर वाहने तर सोडाच पण पायी चालणेसुद्धा अशक्य झाले होते. त्यात त्या रस्त्याला खलाणे येथील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर शेती असल्याने या शेतकऱ्यांना दररोज शेती कामाकरिता येण्या- जाण्याकरिता मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागते.
या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता, हे समजत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूकडून काटेरी झुडपे वळसा घेतल्याने बैलगाडीही नेण्यासाठी कसरत करावी लागत असून शेतीमालही आणता येत नाही. शेतात पाणी देण्याकरिता रात्री व दिवसा मोटारसायकलने जायचे म्हटले तर मोटारसायकल पंक्चर होऊन तशीच लोटून आणावी लागते.
रस्ता नूतनीकरण करण्याकरिता लोकप्रतिनिधीकडे पाठपुरावा केला. परंतु, कोणीही लक्ष दिले नसल्याने शेवटी खलाणे येथील ज्येष्ठ शेतकरी यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांशी हितगुज करून लोकवर्गणीतून या रस्त्याचे काम करण्याचा निश्चय केला आणि लोकवर्गणीतून पैसा गोळा करून या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ करून कामाला गती देण्यात आली.
यावेळी उपसरपंच संजय वाल्हे, ज्ञानेश्वर पाटील,गुलाबसिंग गिरासे, तुषार देसले ,संभाजी वाघ, हरिभाऊ ठाकरे ,भैया गिरासे ,भाईजी ईशी, सुनील गिरासे आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.