शहराला उन्हाळ्याच्या दिवसात पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असतो. यासाठी तापी योजनेच्या बाभळे जलशुद्धीकरण येथील कॅरी पॅक्युलेटरचा गाळ काढणे व अन्य अनुषंगिक कामे आवश्यक होती. अशा प्रकारचे काम हे पाण्याचा स्रोत कमी झाल्यावरच करता येते. सद्य:स्थितीत पाण्याचा स्रोत कमी झाल्याने काम हाती घेण्यात आले. यात शुद्धीकरण केंद्राचा गाळ काढणे, बाभळे ते एमबीआर पाइपलाइनवरील लिकेज काढणे, पारोळा चौफुलीवरील १ हजार ५०० एमएमच्या लाइनवरील दोन मोठे लिकेजेस् काढणे, दोन ठिकाणी एअरव्हॉल वेल्डिंग करणे अशी काही महत्त्वाची कामे पार पाडण्यात आली. स्थायी समितीच्या विशेष बैठकीत सूचित केल्याप्रमाणे ९ तारखेला पाणीपुरवठा रात्री बंद करून सलग ३६ तास काम करण्यात आले. यात पाणी वितरणात दोन दिवसांचा गॅप निर्माण झाला. त्यातच विद्युत पुरवठा खंडित झाल्याने विविध त्रासांना सामोरे जावे लागले. त्यानंतर देवपूर विभागात आणि शहरात पाणीपुरवठा करण्यात आला.
सध्याच्या स्थितीत शहरातील पाणी वितरणाबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. पाणी वितरण व्यवस्थेतील वेळ कमी करण्यासाठी कार्यवाही करण्यात आली. पहाटेपासूनच सर्व अभियंता यांना पाणी वितरणाच्या कालावधीत प्रत्येक जलकुंभावरील वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच वेळ कमी करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी क्रॉस कनेक्शन करणे, आवश्यक त्या ठिकाणी व्हॉल्व बसविणे, तसेच पांझरा पम्पिंग स्टेशन येथील ७५ एचपी पंप सुरू करणे, त्यावरून देवपूर भागात पाणीपुरवठा करणे अशी काही कामे युद्धपातळीवरून हाती घेण्यात आलेली आहेत.
१३६ कोटी योजनेत नव्याने बांधण्यात आलेले जलकुंभ कार्यान्वित करण्यासाठी तसेच अक्कलपाडा योजनेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, ठेकेदार व महापालिकेचे अभियंता यांची एकत्रित बैठकदेखील घेण्यात आली. यात नवीन जलकुंभाचे टेस्टिंग घेणे, त्यासाठी क्रॉस कनेक्शन टाकणे व जलकुंभ सुरू करणे याविषयी निर्णय घेण्यात आला. अक्कलपाडा योजनेतील जॅकवेलचे काम व ब्रिजचे काम तातडीने सुरू करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात आले. तसेच दोन अॅप्रोच पाइपलाइन टाकणे व अन्य अनुषंगिक कामे पूर्ण करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.