धुळे : शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहरात गल्लोगल्ली आणि प्रत्येक कॉलनीत दिवसभर आणि रात्री तर झुंडीत हे श्वान फिरत असतात. त्यामुळे परिसरात रात्री एकट्या व्यक्तीने पायी जाणे म्हणजे जीव मुठीत घेऊन जाण्यासारखे झाले आहे. शहरात गल्लोगल्ली त्वचारोग झालेले भटके श्वान फिरताना दिसतात. या श्वानांनी जर चावा घेतला तर नागरिकांचा जीव धोक्यात येईल, अशी परिस्थिती आहे. ‘या श्वानांना आवर घाला हो, रात्री जीव टांगणीला येतो’, अशी प्रतिक्रिया शहरातील नागरिकांनी ‘लोकमत’ला दिली. शहरातील भटक्या श्वानांचा नागरिकांना होणाऱ्या त्रासासंदर्भात ‘लोकमत’ने रिॲलिटी चेक केले, तेव्हा कॉलनी परिसरात हा प्रश्न रात्री खूपच त्रासदायक बनल्याचे दिसून आले. कॉलनीत रात्री ११ वाजल्यानंतर जाणे म्हणजे जीव मुठीत घेऊन जाण्यासारखेच आहे. कारण कॉलनीच्या रस्त्यावर रात्री श्वानांचेच राज्य असते. हे श्वान रात्री दुचाकीवरुन येणाऱ्यांच्या मागे लागतात, तेव्हा दुचाकीस्वार हा श्वानापासून वाचण्यासाठी वेगाने गाडी चालवतो. यामुळे अपघात होण्याची भीती असते आणि रात्री असे अपघात झालेही आहेत. त्यात काहीजण गंभीररित्या जखमीही झाले आहेत.
रोगट श्वान - शहरात त्वचारोग झालेल्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. घाण पाणी प्यायल्याने अथवा उकिरडयावरील फेकलेले जेवण खाल्ल्याने या श्वानांच्या पाेटात जंत होतात आणि त्यामुळे त्यांना त्वचारोग होतो. यामुळे काही श्वान तर अगदीच विद्रुप दिसतात. अशा श्वानाने जर चावा घेतला तर नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो, अशी परिस्थिती आहे.
धोकेदायक परिसर - शहरातील सर्वच कॉलनी परिसरात एकसारखीच परिस्थिती आहे. तरीसुद्धा चितोड रोड, मिल परिसर, शासकीय दूध डेअरी परिसर, मालेगाव रोड, वडजाई रोड, देवपुरात वाडीभोकर रोड, नकाणे रोडवरील सर्व कॉलनी, दत्त मंदिर चौक, नगावबारी परिसरातील सर्व कॉलन्यांचा यात समावेश आहे.
त्वचाविकारचा रोग - घाण पाणी आणि उकिरडयावरील फेकलेले पदार्थ खाल्याने भटक्या श्वानांना त्वचारोग होतो. त्यावर उपचार न झाल्यामुळे हा रोग वाढतच जातो. महापालिकेने शहरातील भटक्या श्वानांची पैदास नियंत्रित करण्यासाठी उपाय करणे गरजेचे आहे. मनपाने यासाठी निविदाही काढली होती. परंतु, नंतर हे सर्व पेडिंग राहिले. रोगट श्वानांना जंतनाशक गोळ्या खाऊ घातल्या पाहिजेत. शहरात काही सोशल संघटना आणि तरुण वैयक्तिकरित्या हे काम करत आहेत. मनपानेही याकडे लक्ष दिले पाहिजे. अन्यथा ही समस्या हळूहळू गंभीर बनल्याशिवाय राहणार नाही.
- डॉ. संजय पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी, पशुसंवर्धन विभाग