येथील परिसरात अधून मधून ढगाळ वातावरण होत असल्यामुळे तयार भुईमूग पीक उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. हातातोंडाशी आलेला घास पाण्यात जाऊन मातीत मिसळून सर्वच उत्पन्न वाया जाईल, तसेच पशूंचा चारादेखील मातीमोल होईल या धास्तानेच येथील शेतकरी उन्हाची तमा न बाळगता या कामाकडे वळले आहेत.
भुईमूग हे पीक रबी व खरीप दोन्ही हंगामांत येथील शेतकरी घेतात. यातून मिळणाऱ्या चाऱ्याला मोठी मागणी असते. हा चारा कसदार असल्यामुळे जनावरांच्या दुधात वाढ होते. यासाठी लागत असलेली मजुरी बघता चारादेखील फायद्याचा असल्याचे येथील शेतकरी सांगतात. भुईमूग काढणीसाठी मजुरी गगनाला भिडली आहे. तर एकराला ४० माणसे लागत असल्याचे शेतकरी शिवाजी पाटील, दगा तावडे, मुकेश उपासणी, कांतीलाल पाटील यांनी सांगितले.