धुळे : कोरोना महामारीच्या संकटात शिवणयंत्र विक्री आणि दुरुस्ती या व्यवसायाला अत्यावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्यावा, अशी मागणी धुळ्यातील शिवणयंत्र व्यावसायिकांनी शासन-प्रशासनाकडे केली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, कृषिमंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आदींना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, खाद्यपदार्थ, तेल, पशुखाद्य, दवाखाने, औषधालये आदी अत्यावश्यक वस्तूंच्या व्यवसायात शिवण यंत्राची भूमिका महत्त्वाची असते. कोरोनाशी लढण्याचे महत्त्वाचे हत्यार मास्क तयार करण्यासाठी शिवणयंत्राची आवश्यकता असते.
रुग्णालयातील चादर, रुग्णांचे कपडे, डाॅक्टरांचे कपडे, सर्जिकल गाऊन, स्क्रब तयार करण्यासाठीदेखील शिवणयंत्र लागते. या वस्तूंचा वेळेवर आणि पुरेसा पुरवठा झाला नाही तर रुग्णालयांमध्ये असुविधा होऊ शकते. त्यामुळे शिवणयंत्राला अत्यावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक व्यवसायाचा दर्जा द्यावा, अशी मागणी आहे. रब्बी हंगामाची पिके आता काढली जात आहेत तर काहींनी काढली आहेत. धान्य साठविण्यासाठी गोण्यांचा वापर केला जातो. बॅग क्लोझर शिवणयंत्राच्या साहाय्याने गोण्या पॅक करून बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात. तेल उत्पादक तसेच पशुखाद्य कंपन्यांनादेखील शिवणयंत्रे पॅकिंगसाठी आवश्यक असतात.
या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ नये, पुरवठा सुरक्षित आणि नियमित व्हावा यासाठी शिवणयंत्रांची विक्री आणि दुरुस्ती व्यवसायाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्यावा, अशी मागणी शिवणयंत्र विक्रेते आणि दुरुस्ती कामगारांनी केली आहे.