सध्या ऊन खूप तापू लागले आहे आणि शेतात कांदे,गहू, हरभरा,मका पिकांना पाणी भरणे अत्यंत आवश्यक झाले आहे. मात्र कमी दाबाच्या व अनियमित वीज पुरवठ्यामुळे वीजपंप चालत नाहीत. उपलब्ध पाणी देखील भरता येत नाही.
जैताणे उपकेंद्र अंतर्गत खुडाणे शिवारातील त्रस्त शेतकऱ्यांनी जैताणे वीज उपकेंद्रात जाऊन वीजपुरवठा नियमित व योग्य दाबाचा व्हावा या बाबत निवेदन दिले.
दोन महिन्यांपासून कमी दाबाचा वीजपुरवठा होतो आहे, लाईन ट्रिप होत असल्या कारणाने अनेक शेतकऱ्यांच्या मोटारी जळतात, फ्यूज उडतात,डी.ओ. कट होतात, परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. हे असे जानेवारीपासून सुरू आहे. त्यावेळी थंडी असल्याने उभी पिके ऊन सोसत होती. आता ऊन तापू लागल्यामुळे त्याचा परिणाम पिकांवर होत आहे. सर्वच शेतीत मुख्य पीक कांद्याचे आहे.ते करपण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. निवेदनावर दुल्लभ जयराम जाधव, दीपक बाळू शिंदे, सतीश भीमराव लांडगे, भरत शांतीलाल जाधव, देवाजी सुखदेव सूर्यवंशी, दिगंबर बन्सीलाल गायकवाड, मोतीलाल वामन हेमाडे, नंदकुमार संजय शिंदे, बबन भिका बोरसे यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
जैताणे वीज उपकेंद्रातील अधिकारी यांनी याकडे तातडीने लक्ष देण्याची आश्वासन दिले असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.