धुळे : पाटबंधारे विभागाने अक्कलपाडा प्रकल्पातील पाणी उजव्या कालव्याद्वारे सोडले. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता आवर्तन २९ मेस अचानक बंद झाले. यासंदर्भात कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाणी बचाव संघर्ष समितीने आवर्तने पूर्ववत सुरू करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांची भेट घेतली. त्यानुसार ३० मेपासून आवर्तन पूर्ववत सुरू करण्याचे अभियंत्यांनी आदेश दिले. अक्कलपाडा धरणातील पाणी खरीप हंगामासाठी सैयदनगर कालव्याद्वारे मिळावे यासाठी संघर्ष समितीने पाटबंधारे विभागास सूचित केले होते. रब्बी हंगामात गारपिटीने नेर परिसरातील नेर, देऊर खुर्द, देऊर बुद्रूक, भदाणे, लोहगड, लोणखेडी येथील शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले होते. अक्कलपाडा धरणात पुरेसा जलसाठा असल्यामुळे खरीप हंगामासाठी पाण्याचे दोन आवर्तन मिळावे, अशी मागणी समितीने पाटबंधारे विभागाकडे केली होती. त्यानुसार २७ मे रोजी पाटबंधारे विभागाने अक्कलपाडा धरणातील पाणी उजव्या कालव्याद्वारे सोडले. त्यानुसार सदर कालव्याच्या लाभदायक क्षेत्रातील शेतकर्यांनी कपाशी लागवड, मका पेरणी व इतर मशागतीसाठी सुरुवात केली. परंतु पाटबंधारे विभागाने कोणतीही पूर्व सूचना न देता २९ मे रोजी कालव्याचे पाणी बंद केले. त्यामुळे कपाशी लागवड केलेले शेतकरी व इतर पिक पेरणी केलेल्या शेतकर्यांचे बी-बियाणे व खते यासाठी खर्च केलेला असताना पाणी बंद केल्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली. समितीचे अध्यक्ष दिलीप बिरारी, उपाध्यक्ष राजेंद्र वाघ व सचिव प्रदीप देसले व शेतकर्यांनी कुणाल पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वाघ यांची भेट घेतली. त्यांनी कालव्याचे आवर्तन ३० मे रोजी पूर्ववत सुरू करण्याचे आदेश दिलेत. यामुळे भदाणे, नेर, देऊर खुर्द, देऊर बुद्रूक, लोहगड, लोणखेडी, अकलाड, मोराणे, कुसुंबा, चौगाव या गावातील जवळजवळ १५०० एकर जमीन ओलिताखाली येणार आहे.
बंद पाण्याचे आवर्तन पूर्ववत सुरू
By admin | Updated: June 1, 2014 00:30 IST