छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कोरोना विषाणूमुळे उदभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी १९ फेब्रुवारी रोजीचा जयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती साजरी करणे अपेक्षित आहे. दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी या कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी.कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन फक्त १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे. त्याव्दारे कोरोना विषाणू, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर पाळण्याकडे विशेष लक्ष द्यावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाचा मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलिस प्रशासन, स्थानिक प्रशासनाने विहीत केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. असेही आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी गायकवाड यांनी केले आहे.
शिवजयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करा : अपर जिल्हादंडाधिकारी संजय गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:42 IST