गेल्या आठवड्यात पोलिसांनी देवपुरात जास्त दराने हे इंजेक्शन विकताना तीन जणांना अटक केली होती. चौकशीदरम्यान आणखी तीन जणांची नावे पुढे आलीत. अशा पद्धतीने सहा लोकांची आता पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या सहा लोकांच्या माध्यमातून जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होऊ शकतो. पोलिसांच्या चौकशीनंतर हे प्रकरण उघडकीस येऊ शकेल. पण या प्रकरणामुळे रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा सर्व प्रकार म्हणजे टाळूवरचे लोणी खाण्यासारखा घृणास्पद प्रकार आहे.
रेमडेसिविर इंजेक्शनचे नवीन दर जास्त आले आहेत. त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या आणि कंपनीच्या इंजेक्शनचे दर २,८०० रुपयांपासून ५ हजारांपर्यंत आहे. हे एमआरपी दर आहेत. याशिवाय काही सिरिअस रुग्णांसाठी देण्यात येणाऱ्या इंजेक्शनची किंमत ४० हजारांपर्यंत आहे. हासुद्धा एमआरपी रेट आहे. पण जे इंजेक्शन २,८०० रुपयांचे आहे, ते इंजेक्शन एमआरपी दराने विकत घेण्यासाठी गेले तर ते संपूर्ण धुळे शहरासह जिल्हाभरात फिरून आले तरी भेटणार नाही. ते उपब्लध नसल्याचा पाढाच आपल्याला ऐकायला मिळेल. पण खासगी हाॅस्पिटलमध्ये असलेल्या ठरावीक ‘एजंट’मार्फत जादा किंमत देण्याच्या तयारीने गेले तर ते इंजेक्शन जादा दराने लगेच उपलब्ध करून दिले जाते. काही ठिकाणी तर आधी इंजेक्शनची संपूर्ण रक्कम ॲडव्हान्समध्ये घेतल्यानंतरच काही वेळानंतर ते इंजेक्शन उपब्लध करून दिले जाते.
काळ्याबाजारात २,८०० रुपयाचे इंजेक्शन रुग्णाच्या गरजेनुसार ७ ते ८ हजारांपासून २०, २५ ते ४० हजारापर्यंत विकले जात आहेत. तर ४० हजार एमआरपी असलेले इंजेक्शन तर मग ७० ते ८० हजारांपासून लाखापर्यंत विकले जात आहे आणि हा सर्व व्यवहार कुठेही रेकाॅर्डवर येत नाही. ‘सब माल डिब्बे मे’ अशा पद्धतीने हा काळाबाजार सुरू आहे. दिवसेंदिवस इंजेक्शनचे हे दर ऐकून कानावर विश्वास बसणार नाही, दिन दुगना रात चौगुना अशा पद्धतीने त्याचे दर वाढत आहे. रुग्णांच्या परिस्थितीनुसार दर कमी-जास्त केले जात आहे.
रेमडेसिविरचे इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शन अमुक ठिकाणी मिळत असल्याचे कळाल्यावर त्या ठिकाणी आपला नंबर लवकर लागावा म्हणून रात्रभरापासून रांगा लावून उभे असल्याचे दृश्य दिसत आहे. आपला रुग्ण वाचावा म्हणून ते इंजेक्शन मिळविण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. अशावेळी माणुसकी विकलेले काही लोक त्याचा फायदा घेऊन चक्क त्याचा काळाबाजार करीत आहेत आणि रुग्णांचे नातेवाईक कशाही पद्धतीने आपल्या रुग्णाचा जीव वाचवायचा असल्याने ‘अडला नारायण धरी गाढवाचे पाय’ या म्हणीप्रमाणे मागेल त्या किमतीला ते इंजेक्शन मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. याचा गैरफायदा घेणाऱ्या या पवित्र क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या लोकांवर कारवाई करून हा प्रकार थांबविलाच गेला पाहिजे. कोरोनाशी आज सारा देश लढत आहे. अशा परिस्थितीत एक-एक जीव वाचविण्यासाठी धडपड सुरू असताना त्याचा गैरफायदा घेऊन इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्वांचे चेहरे जनतेसमोर येणे आणि हा प्रकार थांबविणे गरजेचे आहे. यासाठी पोलिसांनी त्यांना मिळालेल्या त्या सहा लोकांची कसून चौकशी करून सर्व सत्य जनतेसमोर आणावे, हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा व मागणी आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी याची साखळी तोडण्यासाठी प्रशासन आणि सोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्र आणि खासगी रुग्णालयातील डाॅक्टर्स, परिचारिका आणि रुग्णसेवक हे अहोरात्र झटत आहे. रुग्णालयातील आरोग्य सेवा तोकडी पडत असताना हे लोक त्या सेवेतही रुग्णांना उत्कृष्ट सेवा पुरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सर्व कोरोना योद्ध्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत.
या योद्ध्यांच्या मेहनतीचे चीज व्हावे यासाठी नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरून आपल्यासोबतच आपल्या कुटुंबीय आणि शेजारी राहणाऱ्या लोकांचा जीव धोक्यात घालू नये, आता तरी आपली जबाबदारी ओळखून एक जबाबदार नागरिकाप्रमाणे त्यांची आणि सोबतच स्वत:चीही काळजी घेतली पाहिजे, ही अपेक्षा आहे.