धुळे : शिया वक्फ बोर्ड, उत्तर प्रदेशचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांना त्वरित अटक करून त्यांच्याविरुद्ध करवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्याकडे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीतर्फे रईस काझी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
रईस काझी, शहर उपाध्यक्ष अस्लम खाटीक, मजहर मिर्झा, कफिल खान यांच्यासह इतरांनी जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. वसीम रिझवी हा वादग्रस्त विधाने करून जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. मानसिक संतुलन बिघडलेल्या असून, बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. त्याने सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करून जगाच्या पवित्र असलेल्या धर्मग्रंथ कुराण मधील २६ आयती कुराणातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. त्याच्या या कृत्यामुळे पूर्ण जगामध्ये शांततेचा, मानवतेचा संदेश देणाऱ्या कुराणाचा अपमान केला आहे. त्यामुळे भारतातच नाही तर जगातील मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या आहे. त्याबद्दल वसीम रिझवी याचा निषेधही करण्यात आला. त्याला अटक करून त्याच्याविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.