वडजाई : येथील ग्रामपंचायतीत ग्रामसेविका म्हणून सारिका परदेशी या कार्यरत आहेत. त्यांच्याकडे वडजाईसह साक्री तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा कारभार आहे. त्यामुळे वडजाई येथील कामांना खीळ बसत असून, गावासाठी पूर्णवेळ ग्रामसेविकेची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
ग्रामसेवक हा शासनाचा प्रतिनिधी असतो. शासन व नागरिक यांच्यामधला दुवा असतो. ग्रामसेवकच नसेल तर ग्रामपंचायतीचे संपूर्ण कामकाज ठप्प होते. त्यामुळे विकासकामांसह गावकऱ्यांच्या कामांना ‘ब्रेक’ लागतो. येथे ग्रामसेविका म्हणून सारिका परदेशी कार्यरत आहेत. परंतु, त्यांच्याकडे साक्री तालुक्यातील बळसाणे व वडजाई अशा दोन गावांचा कार्यभार आहे. गावात त्या आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस हजेरी लावतात, बाकी जास्तीत जास्त वेळ त्या साक्रीकडील गावात देत असतात. त्यामुळे ग्रामस्थांची कामे खोळंबतात. यात जन्म व मृत्यू दाखले, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, साफसफाई, आरोग्य, जन्म-मृत्यू नोंदणी, शासकीय योजनांची माहिती व योजनांविषयी गावकऱ्यांना माहितीच मिळत नाही. विवाह नोंदणीसाठी कागदपत्रांवर सह्या आदींसाठी ग्रामस्थांना सारखा ग्रामसेवकांना फोन करावा लागतो. परंतु, त्या फोन उचलत नसल्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे चार ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या वडजाई गावासाठी स्वतंत्र ग्रामसेविकेची नियुक्ती करण्याची गरज आहे. पूर्णवेळ ग्रामसेविकेची नियुक्ती न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.