धुळे : गेल्या आठवड्यापासून धुळे जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढत आहे़जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने तापीची पातळी वाढली आहे़ त्यामुळे सुलवाडे बॅरेजचे आठ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत़ तसेच अनेर प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत़ या प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जलसाठ्यामध्ये घट झाल्याची नोंद करण्यात आली आहे़अनेर प्रकल्पात २६ जुलैपर्यंत १५.१८ दशलक्ष घनमीटर जलसाठा होता़ त्यात घट होवून २ आॅगस्टला १४.१८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे़सुलवाडे बॅरेजमध्ये गेल्या आठवड्यात म्हणजे २६ जुलैला ३३.६३ टक्के जलसाठा होता़ आता २ आॅगस्टला सुलवाडे बॅरेजमध्ये २८.८३ टक्के पाणीसाठा आहे़ जल पातळीसह साठ्यातही घट झाली आहे़ पाण्याचा विसर्ग सुरूच आहे़दरम्यान, मुकटी आणि कनोली हे दोन प्रकल्प पूर्ण क्षमतेने म्हणजे १०० टक्के गेल्या महिन्यातच भरले आहेत़ करवंद आणि बुराई प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत़ याशिवाय नकाणे, डेडरगाव यांसारखे लघु प्रकल्प देखील ओव्हरफ्लो झाले आहेत़ इतर मध्यम प्रकल्पांमध्ये अजुनही समाधानकारक जलसाठा झालेला नाही़ अशा स्थितीत गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाला आहे़मालनगाव, अक्कलपाडा आणि सोनवद प्रकल्पाची पाणीपातळी आणि जलसाठा गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढला आहे़
अनेर, सुलवाडे बॅरेजमधून विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 21:14 IST