महाराष्ट्रात १४ एप्रिलपासून लाॅकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. अत्यावश्यक वस्तू, कृषी, औषधी आदी उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. वरील क्षेत्राशी संबंधित पुरवठा साखळी आणि इतर लघुद्योजकांनाही सवलत द्यावी. यासाठी योग्य ती परवानगी लघुद्योगांवर संबंधित विभागांनी लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी लघुद्योग भारतीचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष रवींद्र वैद्य, महासचिव भूषण मर्दे यांनी केली आहे.
दरम्यान, लघुद्योग भारतीच्या धुळे शाखेनेदेखील पत्रक प्रसिद्धीला दिले असून त्यात म्हटले आहे की, एक वर्षापासून लघुद्योग संकटात असताना महाराष्ट्रातील जे उद्योग परदेशी निर्यात करतात त्यांना काम चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्याच प्रकारे जे उद्योग राज्याच्या बाहेर पुरवठा करतात त्यांनाही सवलत द्यावी, अशी मागणी केली आहे. तसे न केल्यास या उद्योगांसमोर आपला ग्राहक गमावण्याची भीती आहे. हा मुद्दा लक्षात घ्यावा. या ‘ब्रेक द चेन’च्या कालावधीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात लघुद्योग सुरू करण्यासाठी प्रशासनाने सुटसुटीत व पारदर्शी प्रक्रिया राबवल्यास लघुद्योग लवकर सुरू होऊ शकतील, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त करण्यात आली आहे. या काळात लघुद्योग आर्थिक संकटात आसल्यामुळे शासनाच्या कोणत्याही कराच्या मागणीला मुदतवाढ द्यावी, अशीही मागणी केली आहे. नेहमीप्रमाणे सरकारच्या लाॅकडाऊन निर्णयाला लघुद्योग भारती सहकार्य करेल, असे आश्वासन देण्यात आले आहे.