परंडा : शहरातील मुख्य रस्त्याच्या दुभाजकात वृक्ष संवर्धन समिती व वृक्षप्रेमी नागरिकांच्या सहभागातून जवळपास १०० झाडांची लागवड करण्यात आली.
जगभरामध्ये निर्माण झालेली ग्लोबल वॉर्मिंगची समस्या, कोरोना काळात निर्माण झालेला ऑक्सिजनचा तुटवडा, वृक्षतोडीमुळे वनाचे कमी होत चाललेले क्षेत्र, यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे. हा हवामानातील बदलाचा फरक कमी करण्यासाठी झाडे खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. यासाठी वृक्ष लावणे, जोपासणे ही आता जीवनावश्यक बाब बनली आहे. यासाठी परंडा वृक्ष संवर्धन समितीने या सामाजिक कार्याची सुरुवात म्हणून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गारभवानी मंदिर या मुख्य रस्त्यावर दुभाजकात इंडियन ख्रिसमस, पाम कनेरी व कुंडी चाफा अशा दर्जेदार रोपांची लागवड केली आहे.
या कामी बार्शी येथील वृक्षसंवर्धन समिती बार्शी व जाणीव फाउंडेशन या वृक्ष मित्रांचेही मोठे योगदान लाभले.
वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धनही तितकेच महत्त्वाचे असते. ही एक सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी व्यापक स्वरूपात जनजागृती करून अनेक शासकीय विभाग, सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था, समाजातील अनेक दातृत्वशील व्यक्ती यांच्या समन्वयाने वृक्ष संवर्धन करण्यात येऊन येत्या काळामध्ये या चळवळीला व्यापक रूप देण्यात येईल, असे वृक्ष संवर्धन समितीचे परंड्याचे अध्यक्ष बाळासाहेब घोगरे यांनी सांगितले. या कामी सुधीर वाघमारे, आप्पा बल्लाळ, उमेश नलवडे, जयदेव गंभिरे आदिंसह अनेक शिक्षक बांधवांनी श्रमदान केले.