वाशी : जिलह्यात अद्याप ‘बर्ड फ्ल्यू’ आलेला नाही. सध्या केवळ अफवांचे पेव फुटले आहे. त्याचा थेट फटका पाेल्ट्रीचालकांना बसू लागला आहे. त्यामुळे लाखाेंची कर्ज काढून उभे केलेल्या या व्यवसायाचे कंबरडे माेडले आहे. हा प्रश्न लक्षात घेऊन शासनाने अडचणीत सापडलेल्या या व्यावसायिकांना आर्थिक हातभार लावावा, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.
वाशी तालुक्यात शेतीपूरक व्यवसाय म्हणून अंडे व ब्राॅयलर व्यवसाय अनेक शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार करत आहेत़ अंडे व ब्राॅयलरचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे़ साधारपणे ५० लेअर उत्पादक शेतकरी असून जवळपास ७ ते ८ लाख पक्षी जोपासले जात आहेत तर ब्राॅयलरचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ७० ते ७५ च्या आसपास आहे़ देशासह राज्यातील काही भागांत अल्प प्रमाणात बर्ड फ्लूचा संसर्ग झालेला आहे़ साेशल मीडियावर बर्ड फ्लूचा संसर्ग कमी व अफवा मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे अंडे उत्पादक व ब्राॅयलर उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. या अफवेमुळे अंड्याचे भाव गडगडले आहेत तर ब्राॅयलरचे भावही माेठ्या प्रमाणात खाली आले आहेत. ब्राॅयलरचा दर सध्या ४० ते ५५ रुपये तर लेअर पक्षाचे दर ५० ते ५५ रुपये एवढा आहे. पक्षांची जोपासना करण्यासाठी लागणारे खाद्य व अन्य बाबींचे दर गगनाला भिडले आहेत तर दुसरीकडे उत्पन्न निम्म्यापेक्षा खाली आले आहे. उपराेक्त चित्र पाहता, हा व्यवसाय केवळ अफवेने माेडून पडला आहे. त्यामुळे कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केलेले शेतकरी अडचणीत आले आहेत. बँकांचे हप्ते भरणेही कठीण झाले आहे. ही समस्या लक्षात घेऊन सरकारने आर्थिक हातभार लावावा, अशी मागणी जाेर धरू लागली आहे. पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त पसरटे यांना उपराेक्त मागणीच्या अनुषंगाने निवेदन देण्यात आले. यावेळी विठ्ठलराव चौधरी, विक्रम चौघुले, सूरज नाईकवाडी, धारलिंग नकाते, युवराज कवडे, बालाजी चौधरी, सोमनाथ जाधव,अनिकेत रणदिवे, स्वप्निल गपाट, ओमकार गादेकर आदी उपस्थित हाेते.
फोटो- पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त पसरटे यांना निवेदन देताना वाशी तालुक्यातील अंडा उत्पादक व ब्राॅयलर उत्पादक शेतकरी दिसत आहेत़