जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, आ. कैलास पाटील, आ. ज्ञानराज चौगुले, जि. प. अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, नगराध्यक्ष मकरंद निंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
मंत्री शिंदे म्हणाले, नगरपालिका व नगरपंचायती अंतर्गत नागरिकांना हक्काचे घर बांधताना अधिकाधिक सवलती दिल्या आहेत. ही नियमावली १ डिसेंबर २०२० रोजी मंजूर केली असून, ३ डिसेंबर २०२० पासून अंमलात आली आहे. या नियमावलीतील सुलभतेमुळे बांधकामाची गती वाढणार आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात एकसारखेपणा येणार असून, नगरपालिकांच्या पूर्वीच्या कामाचे वेगळेवेगळेपणामुळे नागरिकांना होणारा मनस्ताप थांबणार आहे, असे यावरील नगरविकास मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी नगराध्यक्ष मकरंद निंबाळकर यांनी शहराची २०२१ ची लोकसंख्या गृहीत धरून सध्याची पिण्याच्या पाण्याची योजना तयार केली आहे. परंतु, जिल्ह्यात सातत्याने पडणारा दुष्काळ आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन उजनी धरणातूनच संपूर्ण पाणी मिळावे, त्यासाठी वाढीव पाण्याची समांतर योजना मंजूर करावी, अग्नीशमन विभागासाठी ५ कोटी रूपयांचा निधी मिळावा, भुयारी गटार योजना मंजुरीच्या शेवटच्या टप्प्यात आहे त्या योजनेस लवकर मंजुरी मिळावी. भोगावती नदीस गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे त्यामुळे नदीचे प्रदूषण कमी करून सुशोभीकरण करण्यासाठी निधी मिळावा, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांप्रमाणे न. पा. च्या शिक्षकांना वेतन मिळावे, कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यास मंजुरी मिळावी. २०१३ पूर्वीच्या ६ मिटर रस्त्याच्या विकास नियमावलीतील घराच्या बांधकामासाठी मंजुरी देताना येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात आदी मागण्या केल्या. त्यावर सर्व मागण्यांचा सकारात्मक निर्णय घेतला जाईल. त्याबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे नगरविकास मंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
चाैकट....
वाशी नगरपंचायतीसह उमरगा, तुळजापूर, परंडा पालिकेच्या अध्यक्षांकडून यावेळी आपापल्या शहरातील समस्या मांडण्यात आल्या. त्यावर नगरविकास विभागाशी संबंधित असलेल्या याेजनांचा तातडीने प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश दिले. प्रस्तावांना तातडीने मंजुरी दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरण तसेच उमरग्याच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचा विकास आराखडा सादर करावा त्यासही मंजुरी देऊ असे नगरविकास मंत्री शिंदे यांनी नमूद केले.