तुळजापूर (उस्मानाबाद) : आतापर्यंत शांततेच्या मार्गाने ५८ मोर्चे काढले़ मात्र, सरकार झोपेचं सोंग घेत आहे़ मराठा समाज शांत असला तरी षंढ नाही, वेळ आल्यावर बंड करण्याची धमक ठेवून आहे़ तुळजाभवानी मातेच्या दरबारात आज झालेल्या जागरण-गोंधळानंतर आता उद्यापासून राज्यभर होणारा गोंधळ पहाच ! याला सर्वस्वी सरकारच जबाबदार असेल, अशा तीव्र शब्दात मराठा समाजाने सरकारला निर्वाणीचा इशारा शुक्रवारी तुळजापुरातून दिला.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षण व अन्य मागण्यांसदर्भात आंदोलनाचे दुसरे पर्व सुरु करण्यात आले आहे़ त्याची सुरुवात शुक्रवारी तुळजापुरातून करण्यात आली़ सकाळी ११़३० वाजण्याच्या सुमारास राज्याच्या विविध भागातून आलेल्या मोर्चेकऱ्यांनी येथील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोर्चाला सुरुवात केली़ तेथून थेट तुळजाभवानी मातेच्या महाद्वारावर हा मोर्चा धडकला़ याठिकाणी हजारो मोर्चेकऱ्यांच्या उपस्थितीत जागरण-गोंधळ घालण्यात आला़ यानंतर पाच प्रमुख वक्त्यांनी मोर्चाला संबोधित करताना आंदोलनाची पुढील दिशा व भूमिका विषद केली़
यात समाजातील अबालवृद्ध, महिला, तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ मूकमोर्चांप्रमाणेच हाही मोर्चा शांततेत व शिस्तीत पार पडला़ या मोर्चाला मुस्लिम समाजानेही पाठिंबा दर्शवून ठिकठिकाणी मार्चेकऱ्यांना पाण्याचे वाटप केले़ तसेच अन्य काही मान्यवरांनी फळ, अल्पोपहाराचीही सोय केली होती़