उमरगा नगरपालिका हद्दीत मुळज रोडलगत भारत नगर ही वस्ती आहे. येथे मागील अनेक वर्षांपासून सुमारे १०० ते २०० घरांची वस्ती आहे. तरीही येथे अद्याप रस्ता, पाणी, वीज, स्वच्छता या मूलभूत सुविधा पुरविण्याबाबत पालिका प्रशासनाकडून कार्यवाही झालेली नाही. रस्ते नसल्याने पावसाळ्यात सर्वत्र घाण पाणी साचलेले असते. अशा बिकट अवस्थेत महिला व लहान मुले जीव मुठीत धरून वावरत असतात.
दरम्यान, रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाहुराज माने यांनी भारत नगरला भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी येथील सुमारे ४५ लोकांनी विविध समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. याबाबत सोमवारी उमरगा नगरपालिकेला निवेदन देण्यात येणार असून, या समस्या न सुटल्यास मनसे आक्रमक पवित्रा घेईल, असा इशारा शाहुराज माने यांनी यावेळी दिला.