तुळजापूर : श्री क्षेत्र तुळजापूर विकासासाठी नव्याने आराखडा बनविण्यात येणार आहे. यासाठी शहरवासीयांनी आपल्या सूचना वेबसाईटवर द्याव्यात. त्यानुसार हा आराखडा बनवून त्यास अंतिम मंजुरी देऊन तो शासनाकडे मांडला जाईल, अशी माहिती मंदिर संस्थानचे विश्वस्त आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. शुक्रवारी तुळजापूर शहर व तुळजाभवानी मंदिर यांच्या विकासासंदर्भात आ. पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी नगराध्यक्ष बापूसाहेब कणे, माजी नगरसेवक विनोद गंगणे, माजी जि. प. सदस्य गणेश सोनटक्के, आनंद कंदले यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी आ. पाटील यांनी भविष्यात तुळजापूर शहर कसे असावे, यामध्ये काय काय असावे, येणाऱ्या भाविकांना चांगल्या प्रकारे सेवा सुविधा कशा देता येतील, याबाबत चर्चा केली. तसेच तुळजाभवानी मंदिरात भाविकांना बाहेर जाण्यासाठी नवीन मार्ग, नूतन अभिषेक मंडप, कमीत कमी वेळात लवकर दर्शन व्हावे यासाठी शहरातील सुज्ञ नागरिकांनी नवीन शहर विकास आराखड्यासाठी सूचना द्याव्यात, असे आवाहन केले. यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या तुळजाभवानी मंदिर संस्थांन विश्वस्तांच्या बैठकीची माहिती दिली. जास्तीत जास्त भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी ॲक्सेस पासची मर्यादा वाढविण्यात आली आहे. तसेच सशुल्क दरामध्ये शंभर रुपये कपात करण्यात आली आहे. पुजाऱ्यांच्या मागणीप्रमाणे येत्या पंधरा दिवसांतच मंदिरातील धार्मिक कुलाचार पूर्वीप्रमाणे सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दीड कोटीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे रखडलेले पगार लवकर होतील, असे आ. पाटील यांनी यावेळी सांगितले....
चौकट.......
...तर ॲक्सेस पासबाबत फेरविचार केला जाईल
अभियांत्रिकी महाविद्यालय शासकीय व्हावे यासाठी उच्चतंत्र शिक्षण मंत्री यांच्याकडे पत्र दिले आहे. त्यामुळे हा प्रश्न लवकर मार्गी लागेल, असे सांगून ॲक्सेस पासमुळे देवी भाविकांना त्रास होत असेल तर त्याचा फेरविचार केला जाईल. मुळात एक्सेस पासमुळे भाविकांना लवकर दर्शन व्हावे हा उद्देश आहे. परंतु, हा उद्देश सफल होत नसेल तर याचा विचार करणे गरजेचे आहे.
निधीअभावी रेल्वेचे काम रखडले
तुळजापुरात येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेची मागणी आपण रेल्वे खात्याकडे केली आहे. परंतु, दोन वर्षांपासून राज्य सरकार आपल्या वाट्याचा ५० टक्के निधी देत नसल्याने सोलापूर - तुळजापूर- उस्मानाबाद रेल्वेचे काम रखडले आहे. यासाठी राज्य सरकारचे लक्ष वेधून घेणे गरजेचे आहे. शहरात अत्याधुनिक शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी निधीसह प्रयत्न चालू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा याचे काम लवकरात लवकर सुरू केले जाईल. यासाठी प्राधिकरणाकडे पाठपुरावा चालू आहे, असे आ. पाटील यांनी सांगितले.