ईट : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी बांबूची लागवड करावी, असे आवाहन कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.
येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पटेल म्हणाले, दगडी कोळसा वापरून सध्या वीजनिर्मिती केली जाते. यामुळे वातावरणातील कार्बनचे प्रमाण वाढत आहे. याऐवजी बांबू, धानाचा भुसा व कपाशीची लाकडे वीजनिर्मितीसाठी वापरल्यास थर्मल पाॅवर स्टेशनमध्ये तर कार्बनचे उत्सर्जन कमी होईलच, शिवाय पर्यावरण संतुलनासाठीदेखील फायदा होईल. बांबूपासून इथेनॉलनिर्मितीही होते. पेट्रोल-डिझेलच्या वापरामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असून, त्यासाठी पर्याय म्हणून इथेनॉल आहे. बांबूचे एक झाड एका वर्षाकाठी ३०० किलो ऑक्सिजन निर्माण करते, तर एका माणसाला २८० किलो ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळे बांबू हा उपयोगी वृक्ष आहे. प्लास्टिक, लोखंड, सिमेंट यासारख्या वस्तूच्या वापराला बांबू हा पर्याय आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील चीतंपल्ली येथे शंभर कोटी रुपये खर्च करून बांबूपासून इमारत तयार केली आहे. सध्या औद्योगिकीकरणामुळे कार्बनचे उत्सर्जन वातावरणात वाढत आहे. ते थांबवायचे असेल व जगातील जीवजंतू सुरक्षित ठेवायचे असतील, तर पर्यावरणासाठी बांबू लागवड आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सरपंच संजय आसलकर यांच्या हस्ते पाशा पटेल यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती काकासाहेब चव्हाण, माजी उपसरपंच प्रवीण देशमुख, युवासेना तालुकाप्रमुख निलेश चव्हाण, सर्वोच्च न्यायालयातील ॲड. अप्पासाहेब देशमुख, ग्रामपंचायत सदस्य रविराज देशमुख, गणेश चव्हाण, सुरेंद्र बोंदाडे, सुनील देशमुख, युवराज हुंबे आदी उपस्थित होते.