गेल्या चार-पाच दिवसांपासून येथे ढगाळ वातावरण असून, रविवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह परिसरात पाऊस झाला. त्यानंतर सोमवारच्या संध्याकाळी तसेच मंगळवारी दुपारी आर्धा ते पाऊण तास पाऊस झाल्यामुळे काढण्यास आलेली ज्वारी, गहू, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर आंबा, द्राक्षे, चिकू, कलिंगड, डाळिंब आदी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या कोरोनामुळे शेतकरी पिकवलेल्या शेतमालाचे काय करायचे, या चिंतेत असताना झालेल्या अवकाळी पावसाने वर्षभर कष्ट करून जपलेल्या द्राक्षे, आंबा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या कैरी अवस्थेत असलेला आंब्याचे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात अंथरूण झाले. द्राक्ष बागांचीही अवस्था अशीच झाली असून, द्राक्षांच्या घडात पाणी गेल्यामुळे मनी गळत असून, घडाच्या घड नासत आहेत. त्यामुळे व्यापारी कमी दराने बागांना मागणी करत आहेत. दरम्यान, नुकसान झालेल्या पिकांचे तसेच फळबागांचे पंचनामे करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांमधून होत आहे.
अवकाळीमुळे शेतकरी धास्तावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:30 IST