लोहारा ठाण्यांतर्गत अवैध धंदे वाढले
लोहारा : येथील पोलीस ठाण्यांतर्गत तालुक्यातील जेवळीसह परिसरातील गावामध्ये मुंबई कल्याण नावाचा मटका, अवैध दारू विक्रीसह अनेक धंदे राजरोस सुरू आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असून, काही ठिकाणी शाळकरी विद्यार्थीदेखील याच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने अशा धंद्यांवर कारवाई करून याला आळा घालावा,अशी मागणी होत आहे.
‘पाईपलाईन बदलून सुरळीत पाणी द्या’
ढोकी : येथील कोतवाल गल्ली भागात केवळ नादुरुस्त पाईपलाईनमुळे मागील पाच-सहा वर्षांपासून नळाला पाणी येत नसल्याची या भागातील रहिवाशांची तक्रार आहे. वास्तविक या भागात पाणी पुरवठ्यासाठी जीवन प्राधीकरणाच्या पाणीपुरवठ्याची लाईन टाकण्यात आली आहे. परंतु, काही ठिकाणी ती जाम झाली असल्याचे पाणीपुरवठा होत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही पाईपलाईन बदलून सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
रब्बी पीकांना पाणी सोडल्याने दिलासा
भूम : तालुक्यातील वंजारवाडी मध्यम प्रकल्पातून रब्बी पिकांसाठी कॅनॉलद्वारे पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रब्बी हंगामातील पीक हुरड्यात असून, अशा वेळेत हे पाणी मिळाल्यामुळे ज्वारीसोबतच गहू, हरभरा या पिकांचीही पाण्याची सोय झाली आहे. दरवर्षी दिवाळीनंतर पाणी सोडले जाते. परंतु, यंदा चांगला पाऊस झाल्याने आतापर्यंत ओल होती. आता पिकास पाण्याची गरज आसल्याने पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडण्यात आले आहे.
पुस्तिका वाटप
कळंब : तालुक्यातील मंगरूळ येथील बरडवस्तीवरील शाळेच्यावतीने मुख्याध्यापिका आय. डी. जाधव व ए. एस. आडसुळे यांनी विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका वाटप केल्या. यावेळी शालेय समिती अध्यक्ष बिभीषण गायकवाड व पालक हजर होते.
रस्त्याचा प्रश्न सुटला
कळंब : तालुक्यातील खोंदला येथील पन्नास वर्षांपासून प्रलंबित असलेला शेतरस्त्याचा प्रश्न तलाठी डी. व्ही. शिरसेवाड व मंडळ अधिकारी भिसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून सोडविला. याबद्दल गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.