उस्मानाबाद : एकेकाळी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसमय होता. आता पक्षाची अवस्था पूर्वीसारखी राहिलेली नाही. जिल्ह्यात पक्ष संघटना वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे, पक्ष म्हणून मी लागेल ती मदत करायला तयार आहे, अशी ग्वाही काँग्रेसचे प्रदेश महासचिव तथा लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी दिली.
आ. धीरज देशमुख शनिवारी जिल्हा दौऱ्यावर आले होते. प्रारंभी आळणी फाटा येथे काँग्रेसचे बालाजी साळुंके यांच्या हस्ते आ. देशमुख यांचे देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर शिंगोली येथील शासकीय विश्रामधाम येथे आ. देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी पदाधिकाऱ्यांनी पक्षवाढीचे काम करीत असताना येत असलेल्या अडचणी मांडल्या. देशमुख यांनी प्रामाणिकपणे व तळमळीने पक्षाचे काम करीत असलेल्या कार्यकर्त्यांना संधी देऊ, अशीही ग्वाही दिली. आगामी काळात जिल्हा परिषदा व नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्या ताकदीने लढण्यासाठी कार्यकर्त्यांना मदत करू, कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बैठकीला काँग्रेसचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, एनएसयूआयचे प्रदेश सरचिटणीस रोहित थिटे, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, काँग्रेस विधी विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅड. विश्वजीत शिंदे, विधी विभागाचे मुख्य सचिव अॅड. गणपती कांबळे, अॅड. राहुल लोखंडे, राम पेंढारकर, माजी शहराध्यक्ष समियोद्दीन मशायक, माजी नगरसेवक अॅड. दर्शन कोळगे, मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आशिष मोदाणी, काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, कार्याध्यक्ष प्रभाकर लोंढे, विनोद वीर, ढोकीचे उपसरपंच अमोल समुद्रे, अयुब शेख, दत्ता तिवारी, स्वप्निल शिंगाडे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.