उस्मानाबाद : मागील दोन तीन वर्षांपूर्वी पाण्याची कमतरता आणि पावसाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र कमालीचे घटले होते. यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने पुन्हा शेतकऱ्यांनी ऊस लागवड करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात उसाचे सर्वसाधारण लागवड क्षेत्र ३५ हजार ६६५ हेक्टर आहे. गतवर्षी २८ हजार ३७० हेक्टरवर लागवड झाली होती. यंदाच्या गाळप हंगामासाठी ऊस क्षेत्रात सुमारे ३७ हजार हेक्टरने वाढ झाली आहे मांजरा, तेरणा, बोरी, बाणगंगा, मन्याड, तावरजा आणि सीना या नद्यांच्या वास्तव्याने जिल्ह्यातील जमीन सुपीक बनली आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी नदीकाठचा भाग ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जात होता. मात्र सतत अवर्षण परिस्थिती निर्माण होत असल्याने नद्यांमध्ये पाणी शिल्लक राहिले नाही. पाण्याचा प्रश्न गंभीर होत गेला आणि बागायती पिकांऐवजी कमी कालावधीत येणाऱ्या आणि जिरायती पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला होता. निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मागच्या काही वर्षांपासून सोयाबीन, गहू, ज्वारी, हरभरा या पिकांची अधिक प्रमाणात लागवड केली जात होती. मात्र आता हळूहळू हे चित्र बदलत आहेत.
यावर्षीच्या हंगामात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिके बाधित झाली. त्याचबरोबर दुसरीकडे प्रकल्पांमध्ये जलसाठा निर्माण झाला असून, भूजल पातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे. एकंदर जिल्ह्यात शाश्वत पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. याच पाणीसाठ्याच्या भरवशावर बागायती पीक उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. जिल्ह्यातील ऊस क्षेत्राच्या अहवालावरून ही बाब आता स्पष्ट होत आहे. २०१९-२०२० च्या हंगामात जिल्ह्यात २९ हजार ३७० हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली होती. ती आता यावर्षी ६६ हजार ९३७ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड करण्यात आली आहे. याचाच अर्थ उपलब्ध पाण्यामुळे ऊस लागवडीचे ३७ हजार ५६६ हेक्टर क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे उत्पादनातही वाढ अपेक्षित आहे. मात्र, उसासाठी भरमसाठ पाण्याचा उपसा होत आहे.
चौकट...
तालुकानिहाय २०२१-२०२२ मध्ये गाळपाला येणारे क्षेत्र हे.
तालुका क्षेत्र
उस्मानाबाद - १८,६५५
तुळजापूर- ४४,६६
उमरगा- ९,१०५
लोहारा- ३,१७७
भूम- १,८४०
परंडा- १४,८११
वाशी- १३,४४३
कोट...
जिल्ह्याचे उसाचे सर्वसाधारण क्षेत्र ३५ हजार हेक्टरच्या जवळपास आहे. २०१९-२०२० मध्ये २९ हजार ३७० हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. यावर्षी पाऊस चांगला झाला. त्यामुळे २०२०-२०२१ या वर्षात ६६ हजार ९३७ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. एका एकर ऊस क्षेत्राला ८० लाख लिटर पाण्याची गरज लागत असते. या पाण्यावरच इतर दहा एकर बागायती पिकांचे उत्पादन मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी इतर पिकेही घेणे गरजेचे आहे.
उमेश घाटगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी