पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्याने तेथील ट्रिप रद्द करून मेघालयच्या शिलाँगला हनिमूनला गेलेल्या इंदोरच्या राजा आणि सोनम या नवदाम्पत्याबाबत रहस्य अद्याप उलगडलेले नाही. राजाचा मृतदेह दरीत सापडला असून त्याच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. परंतू, सोनम अद्याप बेपत्ता आहे. तिला बांगलादेशला घेऊन गेले असतील असा दावा राजाच्या भावाने केला आहे.
राजाचा भाऊ विपिन रघुवंशीने गंभीर आरोप केले आहेत. ज्या भागात राजाचा मृतदेह सापडला, त्यांची स्कूटर सापडली त्या भागात यापूर्वीही अनेक जोडपी गायब झालेली आहेत, असा आरोप विपिनने केला आहे. तसेच लुटमारीच्या उद्देशाने आपल्या भावाला मारण्यात आले आणि त्याची पत्नी सोनमला बांगलादेशच्या लोकांनी आपल्यासोबत नेले असण्याची भीती त्याने व्यक्त केली आहे. शिलाँग पोलिस पहिल्या दिवसापासूनच त्याच्या भावाचा आणि पत्नीचा शोध घेण्यात कुचराई करत होते. यामुळे त्याच्या भावाची हत्या झाल्याचा आरोप विपिनने केला आहे.
तिथे कोणतीही व्यवस्था नाही. भावाच्या अंत्यसंस्कारानंतर मी पुन्हा शिलाँगला जाणार आहे. आमच्या घरची सून आजही बेपत्ता आहे, तिचा शोध घेणार आहोत, असे विपिनने सांगितले आहे.
कुटुंबाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच राजाच्या अंत्ययात्रेदरम्यान कुटुंबासह इतर लोकांनी 'राजा रघुवंशी ला न्याय हवाय' अशा घोषणा दिल्या आहेत. राजाची ट्री कटरने हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी हत्येत वापरलेले शस्त्र देखील जप्त केलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
इंदूरचा राजा रघुवंशी आणि पत्नी सोनम २२ मे रोजी हनिमूनसाठी शिलाँगला रवाना झाले. दोघेही सुरुवातीचे काही दिवस त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात होते. त्यानंतर अचानक दोघांचेही फोन बंद झाले. यामुळे इंदूरमधील त्यांचं कुटुंब खूप अस्वस्थ झालं. यानंतर, कुटुंबातील काही सदस्य स्वतः शिलाँगला पोहोचले. मात्र तरी राजा आणि सोनमचा पत्ता लागला नाही. त्यांनी पोलिसांकडे मदत मागितली.