राजकुमार जाेंधळे
लातूर - जोतिबावरून परतताना परळी रेल्वे स्थानक समजून लातूर रेल्वे स्थानकावर उतरलेल्या ३१ वर्षीय तरुणाने लातुरातील ६० फुटी राेडवरील गल्ली क्रमांक ८ येथे सुरू असलेल्या बांधकामावर गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना साेमवारी सकाळी १० वाजता समाेर आली. त्याबाबत विवेकानंद चाैक ठाण्यात आकस्मात मृत्यूची नाेंद केली आहे. नवनाथ वसंत चिवडे असे मृताचे नाव आहे.
पाेलिसांनी सांगितले, परळी वैजनाथ (जि. बीड) येथील हाेळकर चाैक परिसरात वास्तव्याला असलेला तरुण नवनाथ वसंत चिवडे हा चार दिवसांपूर्वी भावाला मी जोतिबा (जि. काेल्हापूर) देवाला जात आहे, असे सांगून घराबाहेर पडला. जोतिबावरून परळीकडे परतताना रविवारी रात्री ताे चुकीने लातूर रेल्वे स्थानकावर उतरला. रेल्वे स्थानकावरून बाहेर पडल्यानंतर त्याने भावाला माेबाइलवर संपर्क केला. भावाने सांगितले, वाट चुकली तरी नवीन रेणापूर नाका येथील बसस्थानकात जा... तेथे परळी वैजनाथला येणाऱ्या बसेस लागतील. भावाला ताे हाे म्हणाला...आणि त्याने माेबाइल बंद केला.
त्यानंतर ताे पहाटेपर्यंत परळीतील घरी परतलाच नाही. वाट चुकल्याने ताे रात्रभर भटकत राहिला. लातुरातील ६० फुटी राेडवरील गल्ली क्रमांक ८ येथे सुरू असलेल्या बांधकामावर गेला. तेथे शिडीला त्याने गळफास घेतल्याचे आढळले. घटनास्थळी पाेलिस निरीक्षक संताेष पाटील, सहायक पाेलिस उपनिरीक्षक विलास फुलारी यांच्यासह चार्ली पथकाने भेट देत पाहणी करुन पंचनामा केला. मृत नवनाथच्या पश्चात आई, दाेन भाऊ, पत्नी, दाेन मुले आहेत.
१० वाजता बांधकाम मजूर आल्यानंतर घटना समजली...बांधकामावरील मजूर साेमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आले असता, त्यांना बांधकामाच्या शिडीला गळफास घेतल्याचे आढळून आले. त्याची माहिती घरमालकाला दिली. विवेकानंद चाैक ठाण्याला त्यांनी कळविले. पाेलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
खिशामध्ये आधार कार्ड; मयताची पटली ओळख...मयताच्या खिशाची तपासणी केल्यानंतर पाेलिसांना आधार कार्ड आढळून आले. दरम्यान, या आधार कार्डावरूनच तरुणाची ओळख पटली. याची माहिती पाेलिसांनी तातडीने त्याच्या परळी येथील कुटुंबीयांना दिली. माहिती समजल्यानंतर परळी येथून भावाने काही वेळात लातुरात धाव घेतली.
पाच वर्षांपासून पत्नी राहते माहेरी...नवनाथ याची पत्नी पाच वर्षांपासून परभणी जिल्ह्यातील माहेरी राहत असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. काैटुंबिक कारणामुळेही त्याची मानसिक स्थिती बरी नव्हती, असे भावाने पाेलिसांना सांगितले. याच नैराश्यातून त्याने हे टाेकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पाेलिसांनी वर्तविला आहे.