औरंगाबाद : निर्भीड व्हा, प्रामाणिक व कठोरतेने जनतेची कामे करा, आत्मविश्वास जागवा, यशस्वी होण्याचा हाच एक मार्ग आहे, असा धडा सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीराम महाजन यांना दिला. दुपारी ३ वाजेपासून सायंकाळी ६ वाजून गेले तरी आमदार महोदय अध्यक्षांचा अॅन्टी चेंबरमध्ये वर्ग घेत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी श्रीराम महाजन यांना विराजमान करण्यात तत्कालीन मंत्री आ. अब्दुल सत्तार यांचा सिंहाचा वाटा आहे. २१ सप्टेंबर रोजी अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर महाजन यांनी १ नोव्हेंबरपासून जिल्हा परिषदेची सूत्रे खऱ्या अर्थाने स्वीकारली. त्यादरम्यान मागे एकदा आ. अब्दुल सत्तार यांनी जिल्हा परिषदेत तब्बल ४ तास घालवून महाजन यांना कारभार कसा हाकावा, याविषयी टिप्स दिल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी पुन्हा ते चार तासांहून अधिक वेळ जिल्हा परिषदेत ठाण मांडून होते. अध्यक्ष श्रीराम महाजन यांची जिल्ह्यात ‘मौनी अध्यक्ष’ म्हणून तयार होत असलेली प्रतिमा खरवडून टाकण्याचा जोरकस प्रयत्न आमदार महोदय करीत होते. चार तासांच्या बौद्धिकात आ. सत्तार यांनी महाजन यांना धीट होण्याचा सल्ला वारंवार दिला. अध्यक्ष कणखर असावा व त्यांनी आत्मविश्वासाने जनहिताचे निर्णय घ्यावेत, असे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकरी, शेतमजूर त्रस्त आहेत; परंतु आजही ग्रामसेवक, शिक्षक व संबंधित यंत्रणेचे कर्मचारी गावात वेळेत पोहोचत नाहीत. यंत्रणा निष्क्रिय झाल्यागत आहे. वचक व नियंत्रण असल्याशिवाय यंत्रणा सक्रिय होणार नाही; परंतु त्यासाठी अध्यक्षांना ठामपणे बोलावे लागेल. जनहितासाठी कुणाचाही मुलाहिजा बाळगण्याची गरज नाही. लोकोपयोगी कामाने अवघ्या महाराष्ट्रात आपला ठसा उमटला पाहिजे. तुम्हाला अध्यक्षपदी बसविल्याचा पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ देऊ नका, असेही त्यांनी अध्यक्षांना खडसावले. अध्यक्षांच्या बौद्धिकानंतर सत्तार यांनी सभापती तांबे व सदस्यांसोबतही चर्चा केली. मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व इतर अधिकाऱ्यांना बोलावून काही सूचना केल्या. विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशीही चर्चा केली.
जि.प. अध्यक्षांचे टोचले कान
By admin | Updated: December 19, 2014 01:00 IST