बीड : २०१२-१३ च्या दुष्काळापेक्षा यंदाच्या दुष्काळाची दाहकता जास्त आहे. असे असतानाही जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही चारा छावणी सुरू करण्यास प्रशासनाला स्वायरस्य वाटत नाही. शेतकऱ्यांकडून मागणी होत असतानाही याकडे दुर्लंक्ष केले जात आहे.तीव्र चाऱ्याची टंचाई जाणवु लागल्यामुळे शेतकरी जनावरांना बाजाराचा मार्ग दाखवत आहे. बाजारपेठेतही जनावरांची आवक वाढल्यामुळे कवडीमोल दरांनी त्याची विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे एकीकडे उत्पादन घटल्यामुळे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे तळ हातावरच्या फोडाप्रमाणे जोपासलेल्या सर्जा-राजाच्या जोडीला मुकावे लागत आहे. यापुर्वी २०१२ साली दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यात सुमारे ८४ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील पशुधन वाचविण्यासाठी मदत झाली होती. यंदा तर ऐन एप्रिल महिन्यापासूनच चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पर जिल्ह्यातूनही कडबा, कडवळ आदी चाऱ्यांची आवक केली जात आहे.अद्यापपर्यंत जिल्ह्यात एकही चारा छावणी सुरू करण्यात आली नसली तर गावपातळीवरून चारा छावण्याची मागणी होत आहे. प्रशासनाकडून दुध संकलन वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. मात्र पशुमालकांना चारा टंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावण्यास सुरूवात झाली असल्याचे चित्र बीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये पहावयास मिळत आहे. जोपर्यंत प्रशासन दुग्धव्यवसाय वाढीच्या मुळाशी म्हणजेच चारा उपलब्धतेबाबत ठोस पाऊले उचलणार नाही तोपर्यंत जिल्ह्यातील दुग्धव्यवसाय वाढणार नाही हे वास्तव चित्र निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)
यंदाही छावण्यांवरच मदार
By admin | Updated: April 24, 2015 00:39 IST