हिंगोली : शहरासह जिल्हाभरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त भरगच्च कार्यकमांचे आयोजन केले होते. ठिकठिकाणी असलेल्या कार्यक्रमांबरोबरच मिरवणुकांनी शहर दणाणून गेले होते. यावेळी सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांमधील सहभाग वाखाणण्याजोगा होता.शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती असल्याने यावेळी अनेक भागात नियोजनपूर्वक उपक्रमांची आखणी केल्याचे दिसून येत होते. त्याचबरोबर प्रशासकीय सहभागाचीही काही कार्यक्रमांना किनार असल्याने शहरात आंबेडकरमय वातावरण झाले होते. शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठमोठ्या होर्डिंग्ज दिसून येत होत्या. दिवसभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागलेल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास विविध भागातून मिरवणुका निघण्यास प्रारंभ झाला. ढोल-ताशा, डिजेच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकांमध्ये विविध कवायती, गीतगायन आदींनी लक्ष वेधून घेतल्याचे दिसून येत होते. पांढऱ्या पारंपरिक पोशाखात निघालेल्या शिस्तबद्ध मिरवणुका हेही यावेळचे अनेक भागातील वैशिष्ट्ये होते. सायंकाळी सहानंतर तर रामलीला मैदान, पुतळा परिसरात पाय ठेवायलाही जागा नव्हती. विविध भागातील जयंती मंडळांच्या मिरवणुका दाखल झाल्याने निळ्या पाखरांच्या गर्दीने परिसर फुलून गेला होता. अबालवृद्ध मोठ्या उत्साहाने मिरवणुकांचा आनंद लुटत होते. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्हाभरात महामानवाला वंदन
By admin | Updated: April 15, 2016 01:42 IST