बाळासाहेब जाधव , लातूर रोजगार हमी योजनेतून काम करण्यात आलेल्या नांदुर्गा ते गुबाळ रस्त्याच्या कामावर मजूर नसताना बोगस १३० मजूर दाखविण्यात आले आहे़ वर्षभरापूर्वी मयत झालेल्या प्रभू दशरथ खटके या मजुराला दाखवून त्यांच्या खात्यावरील रक्कमही उचलण्यात आली आहे़ त्यामुळे रोहयोच्या कामातील भ्रष्टाराचारात कंत्राटदार, अधिकारी व कर्मचाऱ्यांसह बँकांचाही सहभाग असल्याचे या प्रकारावरून दिसून येत आहे़ औसा तालुक्यातील नांदुर्गा येथील प्रभू दशरथ खटके या व्यक्तीचा २३ मार्च २०१३ रोजी मृत्यू झाला आहे़ त्यासंबंधीचे महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाचे ग्रामसेवकाच्या स्वाक्षरीचे मृत्यूचे प्रमाणपत्र असतानाही त्या व्यक्तीला नांदुर्गा ते गुबाळ या सव्वा तीन किलोमीटर रस्त्याच्या कामावर दाखविण्यात आले़ तसेच मयत असतानाही लातूर जिल्हा बँकेच्या खात्यावरुन संबंधीत अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार नांदुर्ग्याचे ग्रामसेवक, लोकप्रतिनिधी, रोजगार सेवक यांनी गुत्तेदाराला हाताशी धरुन मस्टर नं़ ३५७९ मध्ये ७ आॅगस्ट ते १३ आॅगस्ट या कालावधीत त्याच्या नावावरील रोजगार उचलून मयत व्यक्तीच्या टाळूवरचा मलिदा खाण्याचे काम केले आहे़ काम सुरु असतानाच्या कालावधीत या रस्त्यावर एकही मजूर नसताना यंत्राच्या सहाय्याने कामे करुन १३१ मजुरांचा आकडा दाखवून त्यांच्या नावावरील बिले उचलून शासनाची फसवणूक केली आहे़ तरी रोजगार हमी योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी न करता तेरीभी चूप और मेरीभी चूप असा पवित्रा घेतला असल्याने औसा रोजगार हमीच्या योजनेत अधिकारीही गुंतले आहेत की काय, असा समज नागरिकांमधून पसरला आहे़ त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करुन शासनाची फसवणूक करणाऱ्या त्या कालावधीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे़
यंत्राच्या साह्याने झाले रस्त्याचे काम!
By admin | Updated: September 13, 2015 00:04 IST