सितम सोनवणे , लातूरजिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहीरींची कामे प्रामुख्याने सुरु करण्यात आली़ यामध्ये ७ हजार ४७५ सिंचन विहिरींना मान्यता देण्यात आली़ त्यातील ३ हजार ८५२ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत़ अद्यापही ३ हजार ६२३ विहिरींची कामे रखडली आहेत़ लातूर जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस झाला नाही़ परिणामी जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ पाण्यासाठी शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना मैलोमैल पायपीट करावी लागत आहे़ जिल्हा प्रशासनाच्या वतीने टंचाईच्या उपाययोजना म्हणून टँकर व विंधन विहीरींच्या अधिग्रहणाच्या माध्यमातून नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले जात आहे़टंचाईत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या वैयक्तिक सिंचन विहिरींना मोठ्या प्रमाणात मान्यता देण्यात आली़ यामध्ये अहमदपूर तालुक्यात ९५१ विहिरींना मंजुरी दिली असून त्यापैकी ३४१ विहीरींची कामे पूर्ण तर ६१० विहीरींची कामे अद्यापही अपूर्ण आहेत़ तालुकानिहाय रखडलेली कामे अहमदपूर ६१०, औसा - ६६९, चाकूर - ३९९, देवणी - ४६५, जळकोट - २४०, लातूर - २३८, निलंगा -२९८, रेणापूर - २२६, शिरुर अनंतपाळ -१७०, उदगीर - ३०८ अशी ३ हजार ६२३ विहीरींंची कामे रखडली आहेत़
३ हजार विहिरींची कामे रखडली
By admin | Updated: March 26, 2016 00:54 IST