वाळूज महानगर : वाळूजच्या नवीन वसाहतीतील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्यामुळे संतप्त महिलांनी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. सरपंचाच्या वॉर्डातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्यामुळे महिलांनी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना धारेवर धरले.सध्या भीषण पाणीटंचाई आहे. अनेक नवीन वसाहतींमध्ये ग्रामपंचायतीची नळ योजनाच नसल्यामुळे नागरिकांना बोअर, हातपंप व खाजगी विहिरींवरून पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे. येथील पटेलनगर या वसाहतीत ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठ्याची कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. या वसाहतीलगत असलेल्या मनीषानगर व नारायणनगर या वसाहतीत असलेल्या ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीवरून पटेलनगरचे नागरिक पाणी आणत होते. आता तेथेही पाणीटंचाई असल्यामुळे तेथील नागरिकांनी पटेलनगरवासीयांना पाणी भरण्यास मज्जाव केला आहे. बहुतांश नागरिक जारचे विकत पाणी घेऊन तहान भागवीत आहेत.सरपंचाच्या वॉर्डातच पाणीटंचाईपटेलनगर हा वॉर्ड सरपंच सुभाष तुपे यांचा असून, याठिकाणी ग्रामपंचायतीने पाण्याची व्यवस्था न केल्यामुळे नागरिकांना बाराही महिने पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सरपंचाचा वॉर्ड असूनही या वॉर्डातील पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महिलांचा रुद्रावतार; सरपंचांनी दिली ग्वाही...या परिसरात ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा करावा, यासाठी नागरिक अनेक दिवसांपासून ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करीत आहेत. शुक्रवारी संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. या वसाहतीत नळयोजना कार्यान्वित करण्यात यावी, पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची टाकी बसविण्यात यावी, टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा इ. मागण्यांसाठी महिलांनी मोर्चा काढून सरपंच सुभाष तुपे व ग्रामविकास अधिकारी एस. सी. लव्हाळे यांना धारेवर धरले. सरपंच तुपे यांनी या वसाहतीत दोन दिवसांत पाण्याची टाकी बसवून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. आंदोलनात जलाल बेग, मंदा जाधव, हुजरा पठाण, ललिता पारखे, चंदाबाई गंडे, लता जाधव, अनिता गवांदे, प्रमिला खरात, धृपदा खिल्लारे, शन्नो बेग, शबाना शेख, शहनाज शेख, आबेदा शेख, आस्मा शेख, नजमा पटेल, सना पठाण आदी महिला सहभागी झाल्या.
महिलांचा हंडा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2016 00:01 IST