औरंगाबाद : शहरातील व्हाईट टॅपिंगच्या रस्त्यांची कामे दीड महिन्यापासून बंद पडली आहेत. रस्त्यांची कामे होत नसल्यामुळे एकतर्फी वाहतुकीमुळे किरकोळ अपघात होत आहेत. २४ कोटी ३३ लाख रुपयांच्या या कामांची तपासणी विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट पुढच्या आठवड्यात करणार आहेत.विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांची विशेष समिती गठीत करून शासनाने २४ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मनपा निवडणुकीच्या तोंडावर दिला. तो निधी मनपाकडे न देता शासनाने विभागीय आयुक्तांच्या समितीमार्फ त निविदा काढून खर्च करण्याचे आदेश दिले. दीड वर्षापूर्वी मिळालेल्या निधीतून १० महिन्यांपासून शहरातील ५ रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे बंद पडली असून, अर्धवट कामांमुळे अपघात होत आहेत. दोन दिवसांपूर्वी पुंडलिकनगर रोडवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे मोठा अपघात होता-होता वाचला. एकतर्फी वाहतुकीमुळे तो जयभवानीनगर ते गजानन महाराज मंदिर हा रस्ता दिवसभर वाहतुकीच्या कोंडीत आलेला आहे. विशेष म्हणजे या निधीतून सुरू करण्यात आलेल्या एकाही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. याप्रकरणी विभागीय आयुक्त डॉ.दांगट म्हणाले, या किंवा पुढच्या आठवड्यात रस्त्यांची पाहणी केली जाईल. मध्यंतरी आयुक्त बकोरिया यांना रस्त्यांच्या कामांप्रकरणी सूचना केल्या होत्या. निधी मनपाकडे दिलेला आहे. कामांची यादी निश्चित झालेली आहे. असे असताना कामे का बंद आहेत, याची माहिती आयुक्तांकडून घेतली जाईल. पावसाळ्यापूर्वी कामे होतील, असा दावा मनपाने केला होता; परंतु त्या रस्त्यांची कामे बंद आहेत.
व्हाईट टॅपिंगची कामे बंद
By admin | Updated: June 17, 2016 00:36 IST