लातूर : यंदाचा उन्हाळा तीव्र पाणीटंचाईचा असून, गेल्या पाच वर्षांत जानेवारी महिन्यात सरासरी जिल्ह्याची पाणीपातळी ५.६३ मीटर होती. यंदा ८.१८ मीटरवर गेली आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत २.५५ मीटरने पाणीपातळी घटली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १०.२१ मीटरने औसा तालुक्याची पाणीपातळी असून, जळकोट तालुक्यात सर्वाधिक ४.२८ मीटरची घट आहे.भूजल सर्वेक्षण विभागाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी जिल्ह्यातील १०९ विहिरींचे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निरीक्षण केले असून, या निरीक्षणात ८.१८ मीटरवर पाणीपातळी असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील पाच वर्षांत याच विहिरींची पाणीपातळी ५.६३ मीटर होती. गतवर्षीच्या तुलनेत ५.५५ मीटर्सची घट निरीक्षणाअंती समोर आली आहे. अहमदपूर तालुक्यात १५ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, या विहिरीतील पाणीपातळी मागील पाच वर्षांत ५.४७ होती. आता ७.७४ वर गेली आहे. २.२७ मीटरची घट आहे. तर औसा तालुक्यातही १५ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, मागील पाच वर्षांत या विहिरींची पाणीपातळी ७.२३ होती. आता १०.२१ असून, २.९८ ची घट आहे. चाकूर तालुक्यात ७ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, मागील पाच वर्षांत ५.१० मीटर पाणीपातळी होती. आता ७.३३ वर आहे. २.२३ मीटरची घट असल्याचे निदर्शनास आले आहे. लातूर तालुक्यात १८ विंधन विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, मागील पाच वर्षांत ५.३६ मीटर पाणीपातळी होती. आता ७.६२ असून, २.२६ ची घट आहे. निलंगा तालुक्यात १७ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, मागील पाच वर्षांत ६.८२ मीटर पाणीपातळी होती. आता ९.३३ वर आहे. २.५१ मीटरची घट आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यात ५ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, मागील पाच वर्षांत ६.२८ मीटर पाणीपातळी होती. आता ९.२० मीटर असून, २.९२ मीटरची घट आहे. रेणापूर तालुक्यात ११ विंधन विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. मागील पाच वर्षांत या विहिरींची पाणीपातळी ५.१८ मीटर होती. आता ४.४८ मीटर असून, २.३० ची घट आहे. पाण्याची पातळी झपाट्याने घसरत आहे. गेल्या पाच वर्षांत एवढी पातळी खालावलेली नव्हती. ती यंदा खालावलेली आहे. त्यामुळे पुढील मार्च, एप्रिल, मे महिन्यांत तीव्र पाणीटंचाईचा सामना लातूर जिल्हावासियांना करावा लागणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत २.५५ मीटरने पाणीपातळी घटल्याने पाण्याचे स्त्रोत प्रशासनाला शोधावे लागत आहेत. (प्रतिनिधी)उदगीर तालुक्यात ९ विंधन विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, मागील पाच वर्षांत ५.५३ मीटर पाणीपातळी होती. आता ७.३७ मीटर असून, २.१४ ची घट आहे. जळकोट तालुक्यात ४ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, मागील पाच वर्षांत ५.४५ मीटर पाणीपातळी होती. आता ९.७३ आहे. ४.२८ मीटरची घट आहे. देवणी तालुक्यात ८ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, मागील पाच वर्षांत ३.८५ मीटर पाणीपातळी होती. आता ५.४४ असून, १.५९ मीटरची घट आहे.
पाणीपातळी अडीच मीटरने घटली
By admin | Updated: February 9, 2015 00:45 IST