लातूर : तब्बल महिनाभरानंतर महापालिकेच्या वतीने प्रभाग क्ऱ १४ व १५ मध्ये रविवारी नळाला पाणी सोडण्यात आले़ जवळपास ४५ मिनिटे नळाला पाणी आले असून १ ते २ हजार लिटर्स पाणी मिळाले आहे़ मनपा आयुक्तांनी स्वत: काही भागात भेटी देऊन पाणी वितरणाची पाहणी केली असून मुख्य वाहिनीवर असलेले अनधिकृत दोन कनेक्शन त्यांनी कट करून घेतले़टंचाईचे चटके दिवसेंदिवस वाढत असताना टँकरने पाणीपुरवठ्याचे नियोजन मनपाकडून करण्यात आले होते़ मात्र, टँकरने पाणीपुरवठा शक्य नसल्याने प्रशासनाकडून पुन्हा नळाने पाणी देण्याची तयारी करण्यात आली आहे़ त्यानुसार रविवारी काही भागात शासकीय कॉलनीच्या जलकुंभातून ८ एमएलडी पाणी सोडण्यात आले आहे़ सकाळी ७ वाजता पाणी वितरण सुरू करण्यात आले़ त्यात गिरवलकर नगर, चौधरी नगरचा काही भाग, सद्गुरू नगर, पंचवटी नगर, आम्लेश्वर नगर, पठाण नगर, न्यू भाग्यनगर, गजानन सोसायटी, सोना नगर, आवंती नगर, श्रीनगरच्या काही भागांचा समावेश आहे़ ज्या भागात नळाचे पाणी लवकर पोहोचणे शक्य नाही, अशा भागात ३ टँकरच्या माध्यमातनू १४ ट्रिप पाणी देण्यात आले आहे़ बार्शी रोडवरील पाच नं़ चौक ते रेगुडे चौकापर्यंत मुख्य जलवाहिनीला असलेले नळाचे कनेक्शन बंद करण्यासाठी आयुक्त सुधाकर तेलंग यांनी २० कर्मचारी नियुक्त केले होते़ त्यामुळे मुख्य जलवाहिनीवर असलेल्या नळधारकांनाही ४५ मिनिटेच पाणी देण्यात आल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला आहे़ दोन दिवसांपूर्वी पाणी सोडण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला होता. त्या वेळापत्रकानुसार रविवारी पाणी सोडण्यात आले. (प्रतिनिधी)
महिनाभरानंतर नळाला आले पाणी
By admin | Updated: February 8, 2016 00:19 IST