ईट : गाडी फसल्याचे सांगत गावात आलेल्या पाच अनोळखी इसमापैकी एकास पकडून ग्रामस्थांनी नेकनूर (जि. बीड) पोलिसांच्या ताब्यात दिल्यानी घटना भूम तालुक्यातील पांढरेवाडी येथे घडली. यावेळी चौघेजण पसार झाले. दरम्यान, त्यांच्याकडील एक गाडी वाशी पोलिसांनी ताब्यात घेतली असून, दुसरी चिखलात फसल्यामुळे अद्याप घटनास्थळावरच आहे.याबाबत माहिती अशी की, ईटनजीक असलेल्या पांढरेवाडी येथे पहाटे दोन वाजेच्या सुमारास एमएच १४/ बीसी ७१४० या क्रमांकाची कार आणि एमएच ४३/ एबी ३३३१ या क्रमांकाच्या जीपधमधून पंधरा ते वीस लोक बीड जिल्ह्यातील पिंपळगावकडे जात होते. यावेळी पुढे गेलेली जीप पिंपळगाव शिवारात चिखलात फसली. त्यामुळे ही गाडी तेथेच सोडून यातील लोक पसार झाले. यानंतर यामागून येणारी कार पांढरेवाडी शिवारात आल्यानंतर गावातील युवकांनी यातील लोकांकडे चौकशी सुरू केली. यावेळी त्यांनी ‘आमची दुसरी गाडी मांजरा नदीपलिकडे चिखलात फसली आहे’, असे सांगितले. यावर खात्री करून घेण्यासाठी गावातील दोघे युवक या पाचजणांसोबत फसलेल्या गाडीकडे जात असताना सीमाहद्दीवरील मांजरा नदीच्या पुलावरून यातील चौघे फरार झाले. यावेळी युवकांनी एकास पकडून नेकनूर (जि. बीड) पोलिसांच्या स्वाधिन केले. याबाबत नेकनूर पोलिसांशी संपर्क साधला असता पकडलेल्या व्यक्तीचे नाव सुशील हरिभाऊ कोळेकर (रा. सिंगारवाडी, ता. शिरूर, जि. बीड) असे असून, अद्याप त्याची चौकशी सुरू असल्याचे सपोनि पाटील यांनी सांगितले. दरम्यान, पांढरेवाडी गावात ग्रामस्थांनी पकडलेली कार ईट औटपोस्टमधील कर्मचारी भालेराव व ढाकणे यांनी वाशी पोलिस ठाण्यात नेऊन लावली आहे. (वार्ताहर)
चोरटा असल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी एकास पकडले
By admin | Updated: September 10, 2015 00:30 IST