टीम लोकमत , बीडभालचंद्र गणपती मंदिरामुळे जिल्ह्यात लौकिक प्राप्त करणाऱ्या लिंबागणेश (ता. बीड) या गावाने आता विकासाची कात टाकली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजतागायत मूलभूत सोयी-सवलती मिळविण्यासाठी झुंजावे लागले. मात्र, गेल्या तीन वर्षांत विकासाच्या खाणाखूणा दिसू लागल्या आहेत. आता ग्रामस्थांना आधुनिकतेची स्वप्नेही पडू लागली आहेत. गणपतीबाप्पांचा वरदहस्त लाभलेल्या या गावात सामाजिक बांधिलकी जपणारे लोकही आहेत. त्यामुळे माणुसकीचे ‘दर्शन’ पावलोपावली घडते.‘लोकमत’ने शनिवारी लिंबागणेश येथे ‘स्पॉट रिपोर्टिंग’ केले. यावेळी गावकऱ्यांनी उपेक्षा अन् अपेक्षा या दोहींची गोळाबेरीज मांडली. पाचशेवर उंबरे अन् तीन हजार लोकसंख्येचे हे गाव जिल्हा परिषदेचा गट आहे. बीड मतदारसंघाचे आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात याच गटातून झाली. परिसरातील १५ ते २० गावांचा लिंबागणेशमध्ये रोजचा संपर्क असतो. गावाला चिकटूनच भालचंद्र गणपतीचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर सोळाव्या शतकातील आहे. हेमाडपंथी बांधकामाचा अजोड नमुना येथे पहावयास मिळतो. भाद्रपद महिन्यात येथे यात्रा भरते. भाविकांची मोठी श्रद्धा असलेल्या या मंदिराला विकासाची प्रतीक्षा आहे. मंदिरावर चोरांची सतत वक्रदृष्टी पडलेली आहे. दगडी शिळा चोरीला गेल्या होत्या; परंतु त्या जिल्ह्याच्या सीमेवर सापडल्या. तत्पूर्वी एकदा व २६ जानेवारी रोजी मंदिरातील दानपेटी फोडली, त्याचा तपास अद्याप लागलेला नाही. चोरांनी दानपेटीला हात लावल्यावर सीसीटीव्ही बसविण्यास मुहूर्त मिळाला. भाविकांचा ओघ पाहता येथे पुरेशा सोयी- सुविधा नाहीत. त्यामुळे मंदिराचा समावेश तीर्थक्षेत्र विकास योजनेत करावा अन् मंदिराचा कायापालट करावा अशी मागणी गावकरी अनेक दिवसांपासून करताहेत. देवस्थानच्या नावे ६२ एकर जमीन असून मालकी हक्काचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे.प्रत्येक गल्लीत दर्जेदार रस्ते, सौरपथदिवे, शौचालये विकासाची साक्ष देतात. मात्र, स्वच्छतेचा अभाव आहे. सार्वजनिक शौचालयाची उणिव आहे. पोलीस चौकीला हक्काची इमारत आदी प्रश्न ऐरणीवर आहेत. सरपंचांनी जपली माणुसकीसरपंच सुषमा बाळकृष्ण मुळे या बारावी उत्तीर्ण. ग्रा. पं. अस्तित्वानंतर पहिल्या महिला सरपंचपदाच्या त्या मानकरी ठरल्या. गावच्या प्रश्नांची सोडवणूक त्या स्वत: करतात. महिलांचे प्र्शन त्या अतिशय संवेदनशीलपणे हाताळतात. निराश्रीत असलेल्या दोन जुळ्या बहिणींना त्यांनी दत्तक घेतले आहे. पोटच्या लेकरागत त्या त्यांना जीव लावतात. बचत गटातून आत्मसन्मान व स्वावलंबनाची चळवळ त्यांनी गतिमान केली आहे. त्यांचे पती बाळकृष्ण हे पत्नीच्या कामात कधी लूडबूड करत नाहीत. विकासाचे निर्णय ग्रामसभेत होतात. त्यात केवळ सरपंचाला खुर्ची असते. वंचित- उपेक्षितांसाठी सरपंच सुषमा व त्यांचे पती बाळकृष्ण हे दोघे कायम मदतीला उभे राहतात.अंगणवाडी इमारतीची दुरवस्था तीनपैकी एका अंगणवाडीच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. शौचालयाची सुविधा नाही. त्यामुळे बालके, कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. उर्वरित दोन अंगणवाड्या सुविधायुक्त आहेत.तलाठी गायबतलाठी एस. एम. पुराणिक गायब होते. खासगी मदतनीस कागदपत्रे चाळताना आढळला.
गणपतीच्या गावा; बांधिलकीचा ठेवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2016 23:54 IST