मदन बियाणी, कनेरगाव नाका हिंगोली - कनेरगाव नाका या रस्त्याची झालेल्या दुरवस्थेकडे अधिकार्यांनी दुर्लक्ष केले असून लोकप्रतिनिधीही याकडे पाहत नसल्याने त्याचा वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरून वाहने घेऊन जाताना करावी लागणारी कसरत पाहून वाहनधारक चांगलेच धास्तावले आहेत. वाशिम - हिंगोली या रस्त्याचे २८ आॅगस्ट २००९ पासून काम सुरू करण्यात आले होते. केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मिळालेल्या ४ कोटी ८४ लाख रुपयांच्या निधीतून हा रस्ता यवतमाळ येथील कंत्राटदाराने केला होता. या रस्त्याचे काम २० मे २०११ रोजी पूर्ण झाले. त्यानंतर ३ वर्षे या रस्त्याच्या दुरूस्तीची जबाबदार संबंधित कंत्राटदारावर होती; परंतु रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने त्याअधीच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. या रस्त्याच्या दुरूस्तीकडे संबंधित कंत्राटदाराने पूर्णत: दुर्लक्ष केले. आता तर या रस्त्यावर वाहने चालविणेच अत्यंत अवघड झाले आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी छोटे-मोठे खड्डे पडलेले दिसून येत असून काही ठिकाणी तर १ ते २ फुट खोल खड्डे पडलेले दिसत आहेत. अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला आहे. अशा रस्त्यावर वाहने चालविने फार अवघड झाले आहे. कनेरगाव पुढील फाळेगाव पाटीजवळ तसेच फाळेगाव पाटी समोर आंबाळा, आडगाव पुलाजवळ मोठ-मोठे खड्डे पडलेले दिसून येत आहेत. तर वडद पाटी, चिंचाळा पंपाजवळ रस्ता उखडून गेला आहे. त्या पुढे माळहिवरा पाटी समोर रस्त्याची दुरवस्था झाली असून कलगाव उतारात तसेच चढाईवर सुद्धा रस्ता खराब झाला आहे. पारोळा पाटी ते डेन्टल कॉलेज दरम्यान खड्डे पडलेले आहेत. वाहनधारकांना कोणता खड्डा चुकवावा असा प्रश्न पडत आहे. खड्ड्यामध्ये दुचाकी, चार चाकी वाहनांचे नुकसान होत आहे. या राज्य रस्त्यावरील अनेक वाहनधारकांशी सदर प्रतिनिधीनी चर्चा केली असता वाहन धारकांकडून चिंजाजनक प्रतिक्रिया मिळाली. त्यामध्ये कैलास तुकाराम जाधव (रा. जोडतळा), संतोष प्रजापती (मध्य प्रदेश), ओम तनपुरे, सोनू भारुका यांनी सांगितले की, या रस्त्याने वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा रस्ता पावसाळ्यापुर्वी दुरूस्ती करण्यात यावा, नसता पाऊस पडल्यानंतर रस्त्याची मोठी बिकट अवस्था होईल, असेही ते म्हणाले.
कनेरगाव रस्त्यामुळे वाहनधारक धास्तावले
By admin | Updated: May 22, 2014 00:34 IST