अंबड : आतापर्यंतच्या कृषिविमा योजनेतील सर्व त्रुटी दूर करुन शेतकऱ्यांसाठी सर्वंकष कृषि विमा योजना नव्या स्वरुपाने आणण्यात आली असून ती शेतकऱ्यांच्या सर्वाधिक फायद्याची आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविलाच पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी अंबड तालुक्यातील हस्तपोखरी येथे केले.ग्राम किसान सभेस संबोधित कररताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच पांडुरंग घुले होते. पेरणीपासून तर काढणी पश्चातही १५ दिवसांपर्यंत पिकास विमा संरक्षण मिळणार असल्याचे सांगून दशरथ तांभाळे म्हणाले की, वैयक्तिक शेतकऱ्यासही विमा योजनेचा फायदा मिळू शकणार आहे. या अगोदर या योजनेचा फायदा मंडळातील सर्व गावांना होणाऱ्या नुकसानीच्या सरासरीवर मिळत होता. त्यामुळे कधी एखाद्या शेतकऱ्याचे नुकसान होवूनही त्यास विमा मिळत नसे; पण ही त्रुटी आता दूर करण्यात आली आहे. प्रत्येक पिकास असलेला वेगवेगळा विमा दर बदलून आता एक हंगाम एक दर अशा पध्दतीत खरीप पिकासाठी सरसकट २ टक्के तर रब्बी पिकासाठी १.५ टक्के विमादर ठेवण्यात आला आहे. पिक विम्यासाठीचा हा सर्वात कमी दर आहे. प्रास्ताविकात कृषि अधिकारी बाळसागर तौर म्हणाले की, कृषि विषयक विविध योजनांची माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी यासाठी या ग्राम कृषि सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनांचा शेतकऱ्यांनी गरजेनुसार उपयोग घ्यावा, असे तौर म्हणाले. यावेळी तांभाळे यांच्या हस्ते जमिन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका कृषि अधिकारी ज्ञानेश्वर तारगे, संभाप्पा स्वामी, वैशाली कांबळे यांच्यासह सुधाकर वाघ, बोंगाने, ज्ञानेश्वर जगताप, कैलास वाघ, उध्दव घुगे, परसराम बरबडे, संतोष आव्हाड, राजू सोनवणे, संजय किर्तनकार, मिथून पाटील, सुरेश डुकरे, एस. डी. पालवे आदींनी परिश्रम घेतले.
शेतीसाठी सर्वंकष विमा योजना!
By admin | Updated: April 25, 2016 00:33 IST