बँकांची अनास्था : जिल्हा सहकारी बँकेचा वाटपात भोेपळा अमरावती : जिल्ह्यात यंदा रबी हंगामासाठी बॅँकांना ३६७ कोटी ७५ लाखांचे लक्ष्यांक असताना ३० नोव्हेंबरपर्यंत केवळ २९ कोटी ३० लाखांचे पीककर्र्ज वाटप केलेले आहे. वाटपाची टक्केवारी ही केवळ ८ टक्के आहे. यामध्ये शेतकऱ्यांची बॅँक म्हणून ओळखली जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे कर्जवाटप निरंक आहे. खरिपाचे मुख्य पीक सोयाबीन अपुऱ्या पावसाअभावी उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत आहे. मागील वर्षीच्या खरीप पीक कर्जाचे शासनाने पुनर्गठन केले असले तरी रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता आहे. मात्र बॅँकांची पीककर्ज वाटपात अनास्था असल्यामुळे जिल्ह्यात रबी पीककर्ज वाटपाचा टक्का अद्याप ८ टक्क्यांवर आहे. राष्ट्रीयीकृत बॅँकांनी २ हजार ६७३ शेतकऱ्यांना २९ कोटी २४ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. पीककर्ज वाटपाची ही १२ टक्केवारी आहे. ग्रामीण बॅँकांनी १२ शेतकऱ्यांना ६ लाखांचे पीककर्जाचे वाटप केले आहे. वाटपाची ही केवळ ४ टक्केवारी आहे. यापूर्वी खरीप हंगामासाठी बॅँकांना १ हजार ६९५ कोटी ४४ लाखांचे लक्ष्यांक होते. यामध्ये जिल्हा सहकारी बॅँकेने ५६,३२६ शेतकरी सभासदांना ३८९ कोटी ७० लाख ५२ हजारांचे कर्ज वाटप केले. वाटपाची ही ६९ टक्केवारी आहे. राष्ट्रीयीकृत बॅँकांनी १ लाख १४,५०४ शेतकऱ्यांना ९५४ कोटी ३ लाख रुपयांचे कर्जवाटप केले. ही ८५ टक्केवारी आहे. व जिल्ह्यातील ग्रामीण बॅँकांनी १ हजार ४९ शेतकऱ्यांना ७७ कोटी ७ लाखाचे कर्ज वाटप केले. ही ८५ टक्केवारी आहे. या बॅँकांनी खरीप हंगामासाठी १ लाख ७१ हजार ८८० शेतकरी सभासदांना १ हजार ३५१ कोटी ५० लाख ५२ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. (प्रतिनिधी)
दोन वर्षांची ‘प्रतीक्षा’ आता तीन महिन्यांवर
By admin | Updated: December 16, 2015 00:13 IST