राजेश खराडे ल्ल बीड
दुष्काळी परिस्थितीत केवळ पारंपरिक शेती पध्दतीवर अवलंबून न राहता कमी पाण्यावर येणाऱ्या पिकाच्या शोधात पालवण ता़ बीड येथील शेतकरी बाळासाहेब जठार यांनी थेट कृषी प्रदर्शन गाठले आणि त्यामधूनच प्रेरणा घेऊन दोन एकरात अॅपल बोरीची लागवड केली़ त्यांना यामधून सुमारे ३०० क्विंटलचे उत्पन्न मिळाले़ माळरानावर बोरीची बाग लागवड केल्यापासून त्याला दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या होत्या़ यावर मात करीत जठार यांनी दोन एकरामध्ये ठिबक सिंचन केले़ त्या माध्यमातून नियोजनबध्दतेने पाणीपुरवठा केला़ बोरी बागेला लागवडीपासून उत्पादन पदरात पडेपर्यंत पाण्याचे आणि फवारणीचे नियोजन करावे लागते़ त्या अनुषंगाने आठ दिवसाला फवारणी व शेणखताचा मारा केल्यानंतर हे उत्पन्न जठार यांच्या हाती लागले आहे़ लागवडीपासून केवळ ११ महिन्यांमध्ये उत्पादन पदरात पडल्यामुळे पारंपरिक शेतीपध्दतीतून सुटका करून त्यांनी नवीन पध्दतीचा अवलंब केला आहे़ लागवडीपासून प्रत्येक एकरी केवळ ३० हजार रूपये खर्च आला असून यामधून जठार हे लाखो रूपयांचे उत्पन्न सध्या घेत आहेत़ यंदा बोरांना ४० ते ५० रूपये किलो भाव आहे़ पालवणसारख्या खेडेगावातून औरंगाबाद, नांदेड, सोलापूर आदी महानगराच्या ठिकाणी बोरांची निर्यात केली जात आहे़ लागवडीकरिता त्यांनी नाशिक येथून बी-बियाणांची मागणी केली होती़ बाग जोपासण्यासाठी कृषी विभागाचे त्यांना सातत्याने मार्गदर्शन लाभले़ त्या जोरावरच जठार यांनी कमी क्षेत्रात अधिकचे उत्पन्न घेतले आहे़