औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दोनशे विद्यार्थिनींचे पालकत्व घेणार आहे, असे पुणे येथील अतिरिक्त आयुक्त श्याम देशपांडे यांनी घोषित केले. मराठवाडा विद्यार्थी समिती व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहास श्याम देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी भेट दिली. मातोश्री जिजाऊ विद्यार्थिनी वसतिगृह येथे हा कार्यक्रम झाला. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी भारतीय जैन संघटनेचे अॅड.गौतम संचेती, माजी कुलसचिव डॉ. पारस बोरा, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी विद्यार्थी कल्याण विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती डॉ. मोराळे यांनी दिली. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून केंद्रीय व राज्य लोकसेवा तसेच बँकिंग क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. बोरा यांनी केले. मराठवाड्यात गुणवत्तेसोबतच सामाजिक दायित्व असणारे लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. या सर्वांनी गरजू मुलींसाठी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन डॉ. चोपडे यांनी केले. सुमारे दीड तास या मान्यवरांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी वार्डन डॉ. सोनाली क्षीसागर, डॉ. बीना सेंगर, डॉ. सांत्वना मिश्रा, डॉ. गिरीबाला बोंदले, डॉ. सविता बहिरट, एल. ए. जहागीरदार, बाळासाहेब जाधव आदींची उपस्थिती होती.
दोनशे विद्यार्थी दत्तक घेणार..
By admin | Updated: June 20, 2016 00:50 IST